Bacchu Kadu : कडूंचे आंदोलन मागे; पुन्हा एकदा सामंत यांची मध्यस्थी!

uday-samant-mediates-bacchu-kadu-stopped-the-protest : मेळघाटातील प्रश्नांवर ठोस निर्णय घेतल्याशिवाय थांबणार नव्हते आंदोलन

Amravati मेळघाटातील विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी १ मार्चपासून ‘मेळघाट संघर्ष महापदयात्रा’ सुरू केली होती. काटकुंभ येथून प्रारंभ झालेली ही पदयात्रा बामादेही, डोमा, काजलडोह यांसारख्या अतिदुर्गम भागांतून मार्गक्रमण करत सलोना येथे पोहोचली. अखेर पुन्हा एकदा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.

मेळघाटातील प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कडू यांनी सरकारला दिला होता. त्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मेळघाटात येऊन आंदोलकांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीवरून संवाद साधत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

Rajya sabha election : सातही उमेदवारांची निवड निश्चित, राज्यसभा निवडणूक बिनविरोध!

अखेरीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने कडू यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, जून २०२५ मध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी कडू यांनी छेडलेल्या आंदोलनातही सातव्या दिवशी सामंत यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला होता. सलग दोन मोठ्या आंदोलनांमध्ये सामंत यांनीच समेटाची भूमिका बजावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. कडू आणि सामंत यांच्यात नेमके कोणते राजकीय समीकरण आहे, याबाबत राजकीय पातळीवर सध्या कुजबुज सुरू झाली आहे.