Nitin Gadkari’s statement that Abdul Rehman Antulay was originally a ‘Karandikar’ Brahmin : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम, भाजप कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचे केले स्पष्ट
Nagpur महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांच्या धार्मिक आणि जातीय मुळाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. अंतुले हे मुळचे कोकणस्थ ब्राह्मण होते आणि त्यांचे आडनाव करंदीकर’ होते, असे विधान गडकरींनी केले. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी देखील एका कार्यक्रमात गडकरींनी याचा उल्लेख केला होता.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील महाल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गडकरींनी आपल्या भाषणात एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, अंतुले मुख्यमंत्री असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी स्वतः मला सांगितले होते की, मी मुळचा ब्राह्मण असून माझे खरे आडनाव करंदीकर आहे. काही कर्मठ प्रवृत्तींमुळे त्यांच्या पूर्वजांना धर्माबाहेर काढण्यात आले, परिणामी त्यांचा धर्म बदलला. त्या काळात कोंबडी खाणे किंवा परदेशात जाणे यांसारख्या कारणावरूनही समाजातून बहिष्कृत केले जात असे, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.
भारत, इराण, पाकिस्तान आणि कझाकिस्तान यांची संस्कृती एकच असल्याचे सांगत गडकरींनी भाषेचा दाखला दिला. पर्शियन भाषेचा उगम संस्कृतमधून झाला आहे. इराणमधील चाबाहार बंदराच्या कामासाठी गेलो असता, तिथल्या विद्यापीठात संस्कृत विभाग असल्याचे आणि भाषेतील साम्य स्वतः आयतुल्राह खोमेनी यांनी सांगितल्याचे गडकरी म्हणाले.
Baramati by election : बारामती निवडणुकीतून माघार घेण्यासाठी काँग्रेस उमेदवाराने ठेवली अट,
हिंदू हा केवळ धर्म नसून तो एक जीवनप्रवाह आहे. आपण सर्व या एकाच संस्कृतीने जोडले गेलो आहोत, असेही ते म्हणाले.
विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना गडकरी म्हणाले की, भाजप कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. संविधानातील ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून ‘सर्वधर्म समभाव’ असा आहे. भाजप याच विचारधारेवर चालतो. संविधान धोक्यात येईल किंवा मुस्लिमांना देशाबाहेर काढले जाईल, ही भीती केवळ राजकीय हेतूने पसरवली जात असून ती पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. देश चालवणारा नेता हा कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी तो राज्यकारभारात धर्मनिरपेक्ष असावा, मात्र व्यक्ती म्हणून प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार पूजा करण्याचा अधिकार आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा दाखला देत सांगितले की, जर व्यक्ती पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असती, तर राजीव गांधींनी पंतप्रधान असताना पूजाविधीसाठी ब्राह्मणांना बोलावले नसते.








