sushma-andhare-on-cdr-case-eknath-shinde-sit-question-maharashtra : सीडीआर प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल, एसआयटीवरही गंभीर सवाल
Mumbai : राज्यातील कथित सीडीआर प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार आणि एसआयटीच्या कामकाजावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशोक खरात यांचा सीडीआर बाहेर काढण्याच्या प्रकरणात दमानिया यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मात्र त्याच सीडीआरमध्ये नाव समोर आलेल्या एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी कधी बोलावणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अंधारे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, सीडीआरसारखी संवेदनशील माहिती जर एसआयटीकडून निघत नसेल आणि बाहेरील व्यक्तीकडून समोर येत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे फक्त माहिती बाहेर काढणाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर त्या माहितीमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावरही समान पद्धतीने कारवाई झाली पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येत असताना त्यांच्यावर कोणतीही चौकशी न होणे हे संशय निर्माण करणारे असल्याचे त्यांनी ठणकावले.
यावेळी अंधारे यांनी इतर काही नेत्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रुपाली चाकणकर यांना अद्याप चौकशीसाठी का बोलावले गेले नाही, तसेच दीपक केसरकर यांची चौकशी कधी होणार, याबाबतही त्यांनी एसआयटीकडे स्पष्ट उत्तराची मागणी केली. या प्रकरणातील विविध धागेदोरे जोडणारे व्यक्ती म्हणून केसरकर यांचे नाव पुढे येत असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही भूमिका मांडत,⁰ सीडीआर काढणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असले तरी ज्यांचे नाव त्यात आहे, त्यांच्यावर काय कारवाई होणार, हा खरा प्रश्न असल्याचे नमूद केले. सातारा ड्रग्ज प्रकरणासह इतर गंभीर आरोपांवर अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने शासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
अंधारे यांनी एसआयटीच्या तपासाच्या गतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. काही संवेदनशील माहिती ही बाहेरच्या व्यक्तींना सहज उपलब्ध होते, मात्र तीच माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तपासात होणाऱ्या विलंबामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता असून मोठ्या नावांवर हात घालण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणात अशोक खरात यांचे निकटवर्तीय, त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती एसआयटीला देण्यात आल्याचा दावा करत, तरीही त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत अंधारे यांनी व्यक्त केली. दरम्यान, अधोरी विद्या, तंत्रमंत्र आणि ‘वर्षा’ बंगल्यावर केलेल्या कथित कृत्यांच्या चर्चाही सुरू असल्याचा उल्लेख करत, या सर्व प्रकारामागे नेमका कोणाचा फायदा आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. या0 प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून एसआयटीच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_








