Breaking

Health ministry: शासकीय रुग्णालयात डायलिसिसची व्यवस्था करा

Make arrangements dialysis centre in Government hospitals: पीडितांची मागणी, रुग्णांसह नातेवाइकांची फरपट

Wardha शहरासह ग्रामीण भागात किडनीसंदर्भात आजारात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, अनेकांना डायलिसिस करावे लागते. डायलिसिसची सुविधा केवळ जिल्हापातळीवर असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची मोठी पायपीट होत आहे. त्यामुळे डायलिसिसची सुविधा तालुकास्थळी असलेल्या रुग्णालयात करावी, अशी मागणी पीडित रुग्णांकडून करण्यात येत आहे.

शरीरातील अनावश्यक घटक लघवीद्वारे शरीराबाहेर काढण्याचे काम किडनी हे अवयव करते. मात्र, बदलते हवामान, चैनीच्या वस्तूंचा अधिक वापर, व्यसनाधीनता आणि फास्ट फूड खाण्याने अनेक रोगांची निर्मिती झाली आहे. यात किडनी खराब होण्याचे आजार अनेकांना जडले आहेत. किडनी निकामी झाल्याने या रुग्णांना आठवड्यातून दोनदा डायलिसिस करून कृत्रिमरीत्या शरीरातील अनावश्यक पदार्थ काढून टाकावे लागतात. जिल्ह्यात डायलिसिसची व्यवस्था केवळ जिल्हास्थळी आहे.

परिणामी, रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेणे जिकरीचे व आर्थिक त्रासाचे ठरत आहे. त्यामुळे शासनाने तालुका पातळीवरील शासकीय दवाखान्यात ही सेवा सुरू करून द्यावी, अशी मागणी अनेक गरीब रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील रोहणा परिसरात सध्या तीन किडनी आजाराचे रुग्ण आहेत. काही रुग्ण नुकतेच मयत झाले आहेत. यातील अनेक रुग्ण तरुण असून, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अनेक रुग्णांना वरचेवर येथे डायलिसिसला आणणे आर्थिकदृष्ट्या शक्य झाले नाही; परिणामी त्यांच्या डायलिसिसमध्ये नियमितता न राहिल्याने दगावल्याची वस्तुस्थिती आहे.

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वर्धा अथवा सावंगी येथे खासगी वाहनाने घेऊन जावे लागते. रोगाने जर्जर झालेल्या रुग्णांना रुग्णालयात भरती ठेवण्याचीदेखील सोय नाही. इतर रुग्णांना लागण अथवा इन्फेक्शन होईल, अशी कारणे देऊन रुग्णास घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबाचा नाइलाज होतो. यातच रुग्णांना वेळेवर डायलिसिससाठी हजर करण्यात हयगय होऊन विपरित घटना घडल्या आहेत.