sachin-ahir-files-vidhan-parishad-deputy-chairman-nomination-from-eknath-shinde-shiv-sena-big-political-development : ठाकरे गटाला वरळीपासून विधानभवनापर्यंत हादरा
Mumbai : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गट समर्थित उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल झाल्याने या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन टायगर’नंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा रंगली होती. त्यातच ठाकरे गटाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून अर्ज भरल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता विधान परिषदेतही ठाकरे गटाला धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन अहिर यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून सातत्याने संपर्क सुरू होता. उपसभापतीपदाची संधी तसेच भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वरळी परिसरात सचिन अहिर यांचा मजबूत जनसंपर्क, कामगार संघटनांमधील प्रभाव आणि स्थानिक राजकारणातील त्यांचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात घेता त्यांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी खुला करून दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांना उपनेतेपद, पुण्याचे संपर्कप्रमुख आणि भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवरही परिणाम होऊ शकतो, अशी राजकीय निरीक्षकांची भूमिका आहे.
सचिन अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ २०२८ पर्यंत आहे. विद्यमान राजकीय संख्याबळ पाहता भविष्यात पुन्हा विधान परिषदेत निवडून येण्याची शक्यता मर्यादित असल्याचे मानले जात होते. दुसरीकडे वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे वर्चस्व असल्याने विधानसभा निवडणुकीची संधीही मर्यादित असल्याचे राजकीय गणित होते. या पार्श्वभूमीवर भविष्यातील राजकीय स्थान सुरक्षित करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, सचिन अहिर यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार का, याबाबतही चर्चा रंगली आहे. मात्र राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील तरतुदीनुसार विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्यास संबंधित सदस्याला पक्षांतरबंदीच्या काही तरतुदींमधून संरक्षण मिळते. त्यामुळे उपसभापतीपदाच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निर्णयाकडे कायदेशीरदृष्ट्याही लक्ष लागले आहे.
Ncp sharad pawar : शरद पवार गटात अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना उधाण
सचिन अहिर यांनी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २००९ मध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०२० मध्ये त्यांची अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली, तर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. आता ३० जून २०२६ रोजी शिंदे गटाच्या पाठिंब्याने उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला नवे वळण दिले आहे.
या घडामोडीनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना सचिन अहिर यांनी पक्षांतर केले नसून ते मूळचे शिवसैनिक असल्याचा दावा केला. “ते खऱ्या शिवसेनेत परतले आहेत. त्यांच्या निर्णयावर टीका होईल, पण त्यांनी शिवसैनिकांच्या भावनेनुसार निर्णय घेतला आहे,” असे शिरसाट म्हणाले.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटात जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








