Uddhav Thackeray Shivsena demands declaration of a drought : पाच जिल्ह्यांत आंदोलनाचा निर्णय; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी
Akola मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील खरीप पिके करपू लागली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाच जिल्ह्यांत आक्रोश मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी स्थानिक विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या वतीने अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पश्चिम विदर्भावर कोरड्या दुष्काळाचे सावट असताना संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली असून, अद्याप शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळालेली नाही, असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला. कापूस आणि सोयाबीनला हमीभाव देण्याच्या आश्वासनाचाही सरकारला विसर पडल्याची टीका त्यांनी केली.
सध्याच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे पक्षाचे कर्तव्य असल्याचे सांगत देशमुख यांनी पाचही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना आक्रोश मोर्चाच्या आयोजनासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीला संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, सहसंपर्कप्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, महिला आघाडी संपर्क संघटिका कल्पना पुरी, जिल्हा संघटिका डॉ. सरिता वाकोडे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
Maratha reservation : मराठा आरक्षणाची धग वाढली: जरांगे आज मुंबईत धडकणार
अकोल्यात २२ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा
अकोला जिल्ह्यात २२ सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य भवन येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. वाशिममध्ये २१ सप्टेंबर, यवतमाळमध्ये २३ सप्टेंबर, अमरावतीत २८ सप्टेंबर, तर बुलढाणा जिल्ह्यात २९ आणि ३० सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी मौन असल्याचा आरोप
पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपचे स्थानिक खासदार आणि आमदार मौन बाळगून असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केला. केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या स्तरावर प्रभावीपणे मांडल्या जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.






