Vidarbha at the center of industrial sector due to ‘Advantage Vidarbha’ : खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन
Nagpur गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग पुरक वातावरण निर्माण होत आहे. गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत. रोजगार निर्मितीही होत आहे. पर्यटन, उद्योग व दळण-वळण अशा एकानेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात आहे. ‘ॲडव्हांटेज विदर्भ’मुळे विदर्भ उद्योग क्षेत्राच्या केंद्रस्थानी आला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात ‘अॅडव्हांटेज विदर्भ 2025-खासदार औद्योगिक महोत्सवा’चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, पुणे ही राज्यात निर्मिती क्षेत्राची राजधानी म्हणून आकाराला येत आहे. राज्यातील अन्य भागातही उद्योग वाढीस लागत आहेत. नुकत्याच दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. राज्याच्या सर्वच भागात उद्योग वाढीसाठी गुंतवणूक आणण्यात आली आहे. यात विदर्भासाठी 5 लाख कोटींच्या करारांचा समावेश असून गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यु उद्योग समुहाने 3 लाख कोटींची गुंतवणूक करार केले आहेत.
गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे बॅटरी निर्माण, सौरऊर्जा आदी प्रकल्प उभे राहणार आहेत. हे सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गडचिरोलीत गुंतवणूक होत असल्याने नक्षलप्रभावीत जिल्हा म्हणून ओळख पुसून आशिया खंडातील सर्वात मोठे स्टिलहब येथे उभारले जाणार आहे. लगतच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही गडचिरोलीतील गुंतवणुकीचा फायदा होणार आहे.
Dunki in Real Life : श्रीमंत अमेरिकेत ५० लाखाने लुटले, १६ तास चालवले !
गडचिरोलीत येत्या काळात विमानतळ उभारण्यात येणार आहे. अमरावती येथील टेक्सटाइल झोनमध्ये लवकरच उद्योजकांनी जागा व्यापली आहे. आता तिथे अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार आहोत. पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून येथे वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक सक्षम करण्यात येईल.
विदर्भात होणारे कपाशीचे उत्पादन व कपाशीचा आयुध निर्माण क्षेत्रात होणारा उपयोग लक्षात घेता या भागात उद्योग उभारण्यासंदर्भात पुरक वातावरण निर्माण करण्यात येईल. अमरावती येथे आशिया खंडातील सर्वात मोठे विमानचालक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येवून यातून दरवर्षी 25 हजार विमानचालक प्रशिक्षीत करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यात ड्रायपोर्ट निर्मितीसोबतच इलेक्ट्रॉनिक बस हब निर्माण करण्यात येईल.
येत्या 4 वर्षात चंद्रपूर येथे कोल गॅसिफीकेशन व्यवस्था निर्माण करण्यात येईल, नाशिकहून थेट वाढवन बंदरावर माल पोचविण्याचे नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विदर्भातून काकिनाडा पर्यंत दळण-वळणाची संपर्क व्यवस्था आंध्रप्रदेश व तेलंगन राज्यांच्या सहकार्याने करण्याचे नियोजन सुरू आहे. दुबई विमानतळ हबच्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळ हब करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यास समांतर व्यवस्था नागपूर विमानतळावर निर्माण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.