Per acre 30 tons of oranges production is required : केंद्रीय मंत्री गडकरींचे शेतकऱ्यांना आवाहन
Nagpur विदर्भातील संत्रा उत्पादक केवळ प्रति एकर ४ ते ५ टन संत्र्याचे उत्पादन करतात. परंतु स्पेनमध्ये एका एकरामध्ये ३० ते ३५ टन संत्र्यांचे पीक होते. हे लक्ष्य विदर्भातील संत्रा उत्पादकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून गाठावे. यासाठी राज्य सरकार व अॅग्रो व्हीजनच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
नागपुरात पतंजली फूड व हर्बल पार्कचे उद्घाटन झाले. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांची उपस्थिती होती. गडकरी यांनी विदर्भातील संत्रा उत्पादकांनी स्पेनच्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
Baba Ramdev : जय जवान जय किसान जय मिहान हा महाराष्ट्र तो स्वप्न पूर्ण करू
पतंजली तर्फे दररोज ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संत्रा पुरविण्यासाठी विदर्भातील प्रति एकर उत्पादन वाढण्याची आवश्यकता आहे. स्पेनमध्ये सुद्धा संत्र्यांचे उत्पादन घेण्यात येते. या ठिकाणी एका एकरात ३०० झाडे असतात. तर विदर्भात केवळ १०० झाडे असतात. त्याठिकाणी प्रति एकरातून ३० ते ३५ टन उत्पादन घेतले जाते. विदर्भात मात्र केवळ ४ ते ५ टन संत्र्याचे उत्पादन घेऊ शकतात. यात सुधारणा होण्याची गरज आहे. यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी म्हणाले.
यासाठी कलम, जमिनीचे परीक्षण व झाडांची निगा राखण्याच्या तंत्रात बदल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आधुनिक व गुणवत्ता असलेल्या कलमांची निर्मिती महाराष्ट्रात झाली पाहिजे. यासाठी नव्या नर्सरी उभारण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावे. त्याचप्रमाणे राज्यातील नर्सरींचे तांत्रीक गुणवत्ता वाढविण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर संत्र्यावर संशोधन करणार्या संस्थांच्या संचालकांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घ्याव्या, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली.
CM Fadnavis at Patanjali Food Park : फडणवीस मुख्यमंत्रीपदी नसल्याने फूड पार्क रेंगाळला?
विदर्भ हा सर्वाधिक आत्महत्या करणारा प्रदेश आहे. हे चित्र बदलण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी म्हणाले. यासाठी पाण्याच्या थेंबाचेदेखील संवर्धन होण्याची गरज आहे. जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. पिकांच्या उत्पादनात वाढ झाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागणार नाही, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.