Fund of Rs 4 crore 60 lakh for 23 Gram Panchayat areas : २३ ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी चार कोटी ६० लाख रुपयांचा निधी
Wardha जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना परिसरातच शासनाच्या सुविधा तातडीने व सुलभतेने मिळाव्यात, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शासनाने २३ आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या केंद्रांसाठी चार कोटी ६० लाखांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आला आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ व कागदपत्रांसाठी नागरिकांना तहसील अथवा अन्य सरकारी कार्यालयांत जावे लागते. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची लोकसंख्या मोठी आहे. तेथील ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. सरकारी कार्यालयातील कामकाजासाठी प्रचंड वेळ लागतो. ग्रामस्थांना अनेकदा येरझाऱ्या माराव्या लागतात.
वर्धा शहरालगतच्या आणि जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती या लोकसंख्येने मोठ्या आहेत. या ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करून येथील ग्रामस्थांना सहजतेने शासकीय योजनांचा लाभ व आवश्यक कागदपत्रे मिळावीत, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे.
२०२४-२५ मधील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वर्धा तालुक्यातील पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), नालवाडी, पवनार, साटोडा, बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), आंजी (मोठी), सालोड (हिरापूर), म्हसाळा, वरुड, वायगाव, उमरी (मेघे), सेवाग्राम, सेलू तालुक्यातील घोराड, केळझर, हिंगणी, देवळी तालुक्यातील नाचणगाव, गुंजखेडा, आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या. पं.), हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर, वडनेर व समुद्रपूर तालुक्यातील गिरड या ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आदर्श आपले सरकार केंद्राची उभारणी होणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्राला २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. २३ केंद्रांसाठी एकूण चार कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Mahayuti Government : ७५ टक्के लाभार्थी अनुदापासून वंचित, कसे होणार बालसंगोपन?
जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायती या आकाराने मोठ्या आहे. तेथील लोकसंख्या अधिक आहे. तेथील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळावा, विद्यार्थी व ग्रामस्थांना कामकाजासंबंधी कागदपत्रे तातडीने मिळावीत, यासाठी आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रातून ग्रामस्थ विविध योजनांचे अर्ज भरू शकतात. विद्यार्थीदेखील लाभ घेऊ शकतात. लवकरच केंद्र सुरू करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.