Prakash Mahajan’s anger, he said, ‘Where was your voice then’ : प्रकाश महाजन यांचा संताप, म्हणाले ‘तेव्हा तुमचा आवाज कुठे होता’
Mumbai : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे उर्फ गौरी गर्जे यांनी वरळीतील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेवर परस्त्रीसंबंधांमुळे तसेच सततच्या त्रासामुळे गौरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला असून, तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला आहे. या प्रकरणात अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होताच त्याला रविवारी उशिरा अटक करण्यात आली आहे. प्रकरण गंभीर असून राजकीय दुवे समोर येत आहेत.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट पंकजा मुंडेंवर सवालांचा भडीमार केला. गौरीचा मृत्यू घडल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंना याची माहिती रात्रीच मिळाली असेल, मग त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून कठोर कारवाई करण्याचे आदेश का दिले नाहीत, माझा पीए असला तरी त्याच्यावर कडक कारवाई करा असे का सांगितले नाही, असा थेट प्रश्न दमानियांनी उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणात राजकारण न आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले तरी पंकजा मुंडेंविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा अधिक तापली आहे.
Local body election : ठाकरे गटाला धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार !
दमानियांच्या या वक्तव्यावरून पंकजा मुंडे यांचे मामां प्रकाश महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार हल्लाबोल केला. ‘पंकजा मुंडे यांचे नाव आले की अंजली दमानिया बिळातून बाहेर येतात. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्या कुठे होत्या? बीडमधील क्लासेसमधील धक्कादायक प्रकरणात त्यांचा आवाज का उठला नाही? पंकजा मुंडेंविषयी तुम्हाला जणू कावीळ झाली आहे. पंकजाच्या विरोधात बोलण्यासाठी तुम्हाला प्रायोजित केले गेले आहे. उद्या पंकजाबद्दल छोटीशी बातमी आली तरी तुम्ही व्हेंटिलेटरवर असलात तरी मास्क काढून तिच्या विरोधात बोलाल,’ अशा शब्दांत प्रकाश महाजनांनी दमानियांवर टीकेची झोड उठवली. त्यांच्या या प्रतिक्रियेने राजकीय वातावरण आणखी पेटले आहे.
दरम्यान, गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात तथ्य समोर येण्यासाठी पोलिस तपास सुरू असून कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे गुन्ह्याचे स्वरूप अधिक क्लिष्ट झाले आहे. अनंत गर्जेची अटक, दमानियांचे आरोप आणि प्रकाश महाजनांचा संताप यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसाद राज्यभर उमटत आहेत. तपासाच्या पुढील घडामोडीकडे राज्याचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळ लक्ष ठेवून आहे.
_______








