व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Omraje nimbalkar : मध्यरात्री ठाकरे गटाचे दोन आमदार ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला

Omraje nimbalkar : मध्यरात्री ठाकरे गटाचे दोन आमदार ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला

omraje-nimbalkar-operation-tiger-thackeray-group-mla-meeting-pune-political-decision : ऑपरेशन टायगरला ब्रेक लागणार? धाराशिवच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

Mumbai : राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेला नवा ट्विस्ट मिळाला आहे. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी वेग घेतला असतानाच शनिवारी मध्यरात्री घडलेल्या एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यात जाऊन ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर अखेर कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिवंगत पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले होते. या प्रकरणातील आरोपींना विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले होते. मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, ठाकरे गटाकडूनही ओमराजे निंबाळकर यांना पक्षात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार अनिल देसाई यांनीही ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे संकेत दिले होते. अशातच वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांच्या भेटीमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

Anna hazare : अण्णा हजारे यांचा फडणवीस सरकारला थेट इशारा

प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील निवासस्थानी झालेल्या या भेटीत ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यात आली. ठाकरे गटासोबतच राहावे आणि पक्षांतराचा निर्णय टाळावा, यासाठी प्रयत्न झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रविवारी सकाळी ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले असून दुपारी गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर ते आपली अंतिम राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांनंतर धाराशिवसह राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक कार्यकर्त्यांनी सामाजिक माध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

राजकीय गणिताच्या दृष्टीनेही ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ते ठाकरे गटात कायम राहिल्यास कथित फुटीर खासदारांच्या पुढील रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच संसदीय गटातील संख्याबळाच्या समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे केवळ धाराशिवच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Pawanraje nimbalkar murder case : पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष, ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का

विशेष म्हणजे, अलीकडेच ठाकरे गटाने संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या काही खासदारांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

आता कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ओमराजे निंबाळकर कोणता निर्णय घेतात, ते ठाकरे गटात कायम राहतात की नवीन राजकीय वाट निवडतात, यावर राज्याच्या राजकारणातील पुढील समीकरणे मोठ्या प्रमाणात अवलंबून असतील. त्यामुळे धाराशिवमधील आजची बैठक आणि त्यानंतरची घोषणा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

error: Content is protected !!