Harsh criticism from Amravati MP ; अमरावतीच्या खासदाराची सडकून टीका
Amravati ; अमरावतीत काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच पेटली आहे. लोकसभा निवडणुकीत वानखडे यांनी रवी राणांच्या पत्नी व तत्कालीन खासदार नवनीत राणा यांचा पराभव केला होता. त्यानंतर राणा विरुद्ध वानखडे असा वाद सुरू असून, आता विकासकामांच्या मुद्द्यावरून ही लढाई पुन्हा तीव्र झाली आहे.
अलीकडेच रवी राणांनी पत्रकार परिषद घेत खासदार वानखडे यांच्यावर जोरदार टीका केली. “नवनीत राणांचा पराभव म्हणजे अमरावतीचा पराभव आहे. देशात एक चांगली महिला खासदार होती, मात्र आताचे खासदार कुठे आहेत? त्यांचा पत्ता कुणाला माहीत आहे का? त्यांनी एक तरी प्रश्न सोडवला आहे का?” असे प्रश्न रवी राणांनी उपस्थित केले होते.
Shashikant Khedkar : सिंदखेड राजा व देऊळगाव राजात ओला दुष्काळ जाहीर करा
या टीकेला खासदार बळवंत वानखडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “रवी राणा हे अजूनही पत्नीच्या पराभवाच्या नैराश्यातून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळेच ते सातत्याने पराभवाची खंत व्यक्त करतात. गेल्या पाच वर्षांत नवनीत राणांनी काय काम केले हे जनतेसमोर आहे. त्यामुळे अशा बालिश टीका करू नयेत.”
वानखडे म्हणाले, “जिल्ह्यात शेतकरी संकटात असताना रवी राणा आणि पालकमंत्री दहीहंडी कार्यक्रमात व्यस्त होते. त्यावेळी मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे माझ्यावर बालिशपणे टीका करण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे.”
Black Box GPS : केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा
अमरावतीच्या राजकारणात राणा विरुद्ध वानखडे अशी लढत आता अधिक तीव्र होत असून, पुढील काळात या शाब्दिक युद्धाला अजून धार येण्याची चिन्हे आहेत.
____








