Cloudburst wreaks havoc in Lonar and Shegaon talukas : तुपकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; ‘क्रांतिकारी’ पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
Buldhana जिल्ह्यातील लोणार व शेगाव तालुक्यांमध्ये 21 जुलैच्या रात्री आणि 22 जुलैच्या सकाळी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतपिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत, तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के विनाअट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
रविकांत तुपकर यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्तेही या भागात सक्रिय झाले असून, सहदेव लाड यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी तुपकर यांना प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा सादर केला.
Sharad Pawar NCP : तहसीलपुढेच ‘रमी’चा डाव; जळगाव जामोदमध्ये अभिनव आंदोलन
या अतिवृष्टीमुळे लोणार तालुक्यातील आरडव, वाढव, हिरडव, गुंधा, गुंजखेड, चिंचोली सांगळे, पारडा दराडे, देऊळगाव कुंडपाळ, पांगरा डोळे, टिटवी, नांद्रा तर शेगाव तालुक्यातील नागझरी टाकळी, तिंत्रव, जवळा वरखेड, हिंगणा हुई आदी गावांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतांमधील पिके वाहून गेली असून अनेक ठिकाणी पाण्याचा साठा झाल्याने जमीन तलावासारखी झाली आहे.
या परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून, काही ठिकाणी ती शक्यही राहिलेली नाही. आधीच कर्ज काढून केलेली पेरणी वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले असल्याचा इशाराही तुपकर यांनी दिला. “प्रशासनाने तत्काळ सर्व गावांमध्ये पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश द्यावेत, ही आमची स्पष्ट मागणी आहे,” असे तुपकर यांनी निवेदनात नमूद केले.








