Sudhir Mungantiwar in Action Mode for Irai River Protection : संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत मुनगंटीवारांनी दिले निर्देश
Chandrapur – चंद्रपूर शहरातील इरई नदी परिसराच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांना भविष्यातील संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत रहमत नगर येथील इरई नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रामसेतूपासून ते चौराळा पुलापर्यंत प्रथम टप्प्यात संरक्षक भिंत उभारण्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. या माध्यमातून इरई नदी परिसराच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी ठोस नियोजनाला गती मिळणार असून, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूरस्थिती व नदीकाठावरील संभाव्य धोक्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागास संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) तातडीने तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संरक्षक भिंतीचा प्रस्तावित मार्ग व बांधकामाची व्याप्ती निश्चित करून त्याबाबत संबंधित विभागाच्या अभियंत्यांसोबत सखोल चर्चा करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.
Sudhir Mungatiwar : मुनगंटीवारांचा दणका अन् राज्यात ‘लिंकिंग’चा खेळ खल्लास
नदीच्या सकल भागामध्ये माती भरण्याचे काम तसेच सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात यावे, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान महापौर संगीताताई खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वीताई गिरे, नगरसेवक रवी लोणकर, नगरसेवक प्रज्वलंत कडू, नगरसेवक अजहर शेख, नगरसेवक राहुल पावडे, राजीव गोलीवार, डॉ. मंगेश गुलवाडे, चांद सय्यद, ब्रिजभूषण पाझारे, सुरज पेदुलवार तसेच रहमत नगर येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मुनगंटीवार सातत्याने पुढाकार घेत असून, शहराच्या विकासाबाबत ते नेहमीच आग्रही राहिले आहेत. शहराच्या वाढत्या गरजा, नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा सातत्याने भर राहिला आहे. विकासाच्या प्रत्येक विषयाकडे ते केवळ एक काम म्हणून नव्हे, तर चंद्रपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठीची जबाबदारी म्हणून पाहत आले आहेत.








