MLA attacks ruling party over farmer suicides : शेतकरी आत्महत्यांवरून रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Chikhali “७७० शेतकरी आत्महत्या करूनही सरकार गप्प आहे. भरोसा येथील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली तरी पालकमंत्री साधे सांत्वनासाठीही आले नाहीत. हे सरकार संवेदनाशून्य आणि शेतकरी विरोधी आहे,” अशा कठोर शब्दांत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी २९ जुलै रोजी भरोसा (ता. चिखली) येथे भेट देऊन आत्महत्या केलेल्या गणेश आणि रंजना थुट्टे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सरकारच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली.
हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे विदर्भातील हजारो शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री आणि सरकारच्या वरिष्ठांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. “सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा कळतच नाहीत. हे केवळ घोषणांची सरकार राहिले आहे,” असा घणाघात पवार यांनी केला.
“विमा कंपनीचे चार ट्रिगर राज्य सरकारने हटवल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. राज्य सरकारने १० लाख टन खरेदी केल्याची शेखी मिरवली, पण ५० लाख टन उत्पादन झाले. उरलेल्या ४० लाख टनांसाठी शेतकऱ्यांना केवळ ३८०० रुपये भाव मिळाला – हा थेट अन्याय नाही का?” असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.
पवार यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, “जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यात तब्बल ७७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही सरकार गप्प का आहे? यंदा केवळ २० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून बहुतांश शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहतील.”
या दौऱ्यात माजी आमदार रेखाताई खेडेकर, जि.प. माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, नरेश शेळके, बी.टी. जाधव, पी.एम. जाधव, ज्योतीताई खेडेकर, भास्कर काळे, गजानन वायाळ, समाधान परिवार व इतर स्थानिक नेते आणि शेतकरी उपस्थित होते.








