raj-thackeray-slams-mohan-bhagwat-over-marathi-identity-and-linguistic-movements : हिंदी लादणाऱ्यांना जाब विचारण्याचा सल्ला, केंद्रातील सत्तेच्या दबावामुळेच मान्यवरांची उपस्थिती
Mumbai राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मराठी भाषिक आंदोलनांबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत, “भाषेबद्दलचे प्रेम जर आजार असेल, तर हा आजार संपूर्ण देशात आहे,” असे ठणकावून सांगितले. मुंबईतील वरळी येथील संघाच्या कार्यक्रमात भागवत यांनी केलेल्या टिप्पणीवरून राज ठाकरेंनी संघप्रमुखांच्या भूमिकेवर बोचरी टीका केली आहे.
वरळी येथील नेहरू केंद्रात पार पडलेल्या ‘संघ यात्रा के १०० वर्ष’ या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावर राज ठाकरेंनी निशाणा साधला. “कार्यक्रमाला आलेली मंडळी संघप्रमुखांच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर केंद्रातील सत्तेच्या दबावामुळे तिथे उपस्थित होती,” असा खळबळजनक आरोप राज ठाकरेंनी केला.
यापूर्वी अशा प्रवचनांना इतकी गर्दी का दिसत नव्हती, असा सवाल करत त्यांनी सत्तेच्या प्रभावावर बोट ठेवले. संघप्रमुखांनी भाषिक आंदोलनांना ‘आजार’ संबोधल्याने राज ठाकरे संतापले. देशात भाषावार प्रांतरचना का झाली आणि लोकांसाठी आपली भाषा का महत्त्वाची आहे, याचे भान संघप्रमुखांना असायला हवे, असे ते म्हणाले.
कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि खुद्द गुजरातमध्येही तीव्र भाषिक अस्मिता आहे. मग केवळ महाराष्ट्राच्या आंदोलनांवरच बोट का, अशी विचारणा त्यांनी केली. जेव्हा बाहेरचे लोक स्थानिक संस्कृती नाकारतात आणि भाषेचा अवमान करतात, तेव्हा होणारा उद्रेक हा ‘आजार’ नसून स्वत्व जपण्याची धडपड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Revati Sule : सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेचं लग्न ठरलं; कोण आहेत सारंग लखानी
राज ठाकरेंनी संघाच्या ‘समरसता’ संकल्पनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातमध्ये जेव्हा परप्रांतीयांविरुद्ध रोष व्यक्त झाला, तेव्हा तिथे समरसतेचे धडे द्यायला संघप्रमुख का गेले नाहीत? समरसतेच्या गोष्टी करणाऱ्यांनी आधी देशभर हिंदी लादण्याच्या सरकारी प्रयत्नांना जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी माणूस सहनशील आहे आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी कणाहीन आहेत, म्हणूनच अशी वक्तव्ये करण्याची हिंमत होते, अशी तोफ त्यांनी डागली. “हिंदूंवर हल्ला झाला तर आम्ही हिंदू म्हणून उभे राहूच, पण हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या दांभिकपणावर संघप्रमुख कधी बोलणार?” असा सवाल करत त्यांनी गोहत्या राजकारण आणि ‘बीफ’ निर्यातीतील वाढ यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर बोट ठेवले.








