praful-patel-announces-sunetra-pawar-ncp-national-president-decision-in-15-days : प्रफुल्ल पटेल यांची मोठी घोषणा, विलिनीकरणावर मौन कायम
New Delhi : नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून येत्या १५ दिवसांत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा कोणाच्या हाती जाणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देत सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही उपस्थित होते. या भेटीदरम्यान केंद्रातील नेत्यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याची माहिती पटेल यांनी दिली.
PMC Corporation : पुणे महापालिकेत सत्तेची सूत्रे पुन्हा जुन्याच कारभाऱ्यांच्या हाती!
पक्षांतर्गत बाबींवर बोलताना पटेल यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या पश्चात कोणतेही पाऊल हे सुनेत्रा पवार आणि कुटुंबीयांना विचारल्याशिवाय उचलले गेलेले नाही. पक्षातील बहुतांश नेत्यांची इच्छा सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १५ दिवसांत अध्यक्षपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पटेल यांनी भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाला बळकट करणे आणि राज्यभर संघटन वाढवणे हेच सध्याचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. इतर चर्चांनी पक्ष विचलित होणार नसल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
Ganesh Naik : मंत्रिपद काय चाटायचंय का? नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून गणेश नाईकांचा संताप
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी मोठा दावा करत १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. मात्र, या दाव्याला दुसऱ्या गटाकडून विरोध दर्शवण्यात येत असून अशा कोणत्याही निर्णयाची माहिती नसल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही गटांतून दावे-प्रतिदावे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावर स्पष्टता येऊ लागली आहे. सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य नियुक्तीमुळे पक्षात स्थैर्य येईल का आणि विलिनीकरणाच्या चर्चांना कोणते वळण मिळेल, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
__








