nashik-tcs-case-matin-patel-nida-khan-illegal-construction-action : नाशिक टीसीएस प्रकरणात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल अडचणीत
Chhatrapati Sambhajinagar : नाशिकमधील चर्चित टीसीएस प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याभोवती अडचणींचे जाळे अधिक घट्ट होताना दिसत आहे. पोलिसांकडून या प्रकरणात आरोपी करण्यात आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही मतीन पटेल यांच्या घरासह कार्यालयावर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेकडून त्यांच्या कथित बेकायदेशीर बांधकामांना नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसांत समाधानकारक खुलासा न झाल्यास बुलडोझर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरात निदा खान वास्तव्यास होती ते घर अतिक्रमण करून उभारण्यात आल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. संबंधित घरावर अधिकाऱ्यांनी नोटीस चिटकवली असून नारेगाव परिसरातील आणखी एक निवासस्थान आणि कार्यालयालाही अतिक्रमणाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस तपासाबरोबरच महापालिकेची कारवाईही वेगाने पुढे जात असल्याचे दिसत आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, निदा खान गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास होती. ती एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर शहरात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. मतीन पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी नारेगाव परिसरातील कौसर पार्क भागात नवीन फ्लॅट खरेदी केला होता आणि याच ठिकाणी निदा खानला ठेवण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
Supriya sule : मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निदा खानला आश्रय दिल्याचे नेमके कशाच्या आधारे सांगितले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे शिक्षा होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणात मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप केला.
असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात बोलताना, टीसीएसच्या अधिकृत भूमिकेचा उल्लेख करत निदा खानचा एचआर विभागाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. एफआयआर दाखल होण्यापूर्वीच तिची बदली झाल्याचा दावा त्यांनी केला. काही लोक हेतुपुरस्सर द्वेषातून एमआयएमला लक्ष्य करत असल्याचेही त्यांनी म्हटले. बुरखा घालणे कधीपासून बेकायदेशीर झाले, असा सवाल करत न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत पोलीस तपास आणि महापालिकेच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








