व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay raut : ‘१५० कोटींचा घोडेबाजार झाला’, भाजपला थेट सवाल

Sanjay raut : ‘१५० कोटींचा घोडेबाजार झाला’, भाजपला थेट सवाल

sanjay-raut-alleges-150-crore-horse-trading-in-vidhan-parishad-elections-targets-bjp : विधान परिषद निवडणुकांवरून संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Mumbai : विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि काही जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा घोडेबाजार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडे पुरेसे संख्याबळ असतानाही अशा प्रकारच्या हालचाली का करण्यात आल्या, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

विधान परिषद निवडणुकांसाठी अर्ज माघारीचा कालचा शेवटचा दिवस होता. विविध पक्षांकडून बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी या प्रयत्नांना यश मिळाले, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीला धक्का बसल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Amravati shivsena: अमरावती उद्धवसेनेत फूट, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, शिंदेसेनेत दाखल होण्याची चर्चा

राऊत म्हणाले की, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि इतर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले. या सर्व माघारी आणि बिनविरोध निवडींसाठी एकूण १५० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी ११ विधान परिषद निवडणुकांमध्येही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांना उद्देशून बोलताना राऊत म्हणाले की, तुमच्याकडे जिंकण्यासाठी पुरेसेच नव्हे तर प्रचंड संख्याबळ आहे. मग अशा परिस्थितीत घोडेबाजार करण्याची गरज काय आहे? जर बहुमताच्या जोरावर विजय निश्चित असेल, तर उमेदवारांना माघार घेण्यासाठी एवढा आटापिटा का केला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काटकसरीचा सल्ला देतात, मोठे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करतात, मग निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्यास परवानगी दिली आहे का, असा खोचक सवालही राऊत यांनी केला. कोकणातील एका माघारीसाठी २५ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यातील काही रक्कम मुंबईतील बीकेसी परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्येही अशाच प्रकारचे व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला.

उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय मिळाले, हे आता हळूहळू समोर येत असल्याचे सांगत राऊत यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सध्या जे चित्र निर्माण झाले आहे, ते लोकशाहीला कलंक लावणारे आहे. या प्रकारामुळे राज्याची प्रतिमा, संस्कृती आणि राजकीय परंपरा यांनाही धक्का बसत आहे.

Legislative election: अमरावती विधान परिषद निवडणूक : प्रशांत महल्ले यांची माघार; पोटे-देशमुख-विश्वकर्मा यांच्यात त्रिकोणी लढत

सत्ताधाऱ्यांवर टीकेची धार आणखी तीव्र करताना राऊत म्हणाले की, केवळ सत्ता टिकवण्यासाठी आणि विरोधकांना रोखण्यासाठी पैसा आणि ताकदीचा वापर केला जात आहे. लोक सर्व काही पाहत असून या घडामोडींवर सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल. पैशांच्या जोरावर राजकारण करण्याची ही नशा उतरलीच पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि महायुती सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून या आरोपांना सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!