Chief Minister Fadnavis enjoys boating in Ambazari Lake after it was cleared of water hyacinth : देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेच्या प्रयत्नांची थोपटली पाठ
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संपूर्णपणे जलपर्णीमुक्त झालेल्या नागपूरच्या ऐतिहासिक अंबाझरी तलावात बोटीतून फेरफटका मारला. अंबाझरीचे सौंदर्य पुनरुज्जीवित केल्याबद्दल नागपूर महापालिकेच्या प्रयत्नांची पाठ थोपटतानाच, वाडी येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रामुळे यापुढे एमआयडीसीचे दूषित पाणी तलावात येणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
अंबाझरी तलावाच्या पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, अंबाझरी तलाव हे नागपूरचे खरे वैभव आहे. मी लहानपणापासून हा तलाव पाहत आलो आहे. सुरुवातीच्या काळात नागपूरकरांची तहान भागवण्यासाठी हे धरण बांधले गेले होते. पुढे पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय झाल्यावर या परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरूप आले. मात्र, गेल्या काही वर्षांत तलावाला वेढलेल्या जलपर्णीमुळे हा ऐतिहासिक तलाव नामशेष होतो की काय, अशी मोठी चिंता नागपूरकरांना सतावत होती.
या गंभीर समस्येवर नागपूर महापालिकेने ठोस पावले उचलत संपूर्ण अंबाझरी तलाव जलपर्णीमुक्त केला आहे. या धडक मोहिमेचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी अंबाझरीचा एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून पूर्ण क्षमतेने विकास केला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच या पर्यटन प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी आर्थिक व प्रशासकीय मदत पुरवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
वाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यामुळे आता एमआयडीसी भागातील दूषित पाणी तलावात मिसळण्याचा मार्ग कायमचा बंद झाला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना मोठा दिलासा दिला आहे.








