Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi’s ‘Chhatron Ki Goonj’, saying it is limited only to children from schools run by Congress leaders : काँग्रेसच्या ‘वंदे मातरम’विरोधी भूमिकेवरही टीका
Nagpur काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या उपक्रमावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नसून केवळ काँग्रेस नेत्यांच्या शाळांमधील मुलांपुरताच मर्यादित आहे, असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. यासोबतच, विरोधकांच्या ‘वंदे मातरम’विरोधी भूमिकेवर आणि लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यातील कार्यक्रमावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांची ‘छात्रों की गुंज’ केवळ काँग्रेस नेत्यांच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यांच्याच शाळांमधील मुलांचे रजिस्ट्रेशन केले जात असून, त्यांच्याच शिक्षण संस्थांमध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यात सर्वसामान्य किंवा बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना कुठलेही स्थान नाही. काँग्रेसने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या नावाखाली केवळ स्वतःचेच राजकीय दुकान मांडल्याचे ते म्हणाले.
विरोधकांकडून ‘वंदे मातरम’ म्हणण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा फडणवीस यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. संसदेने कायदा पारित केला आहे आणि त्याचे पालन करणे प्रत्येकाचे संवैधानिक कर्तव्य आहे. तो अमान्य करणे हे थेट संविधानाविरोधी वर्तन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही घटना काँग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षांना मान्य नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीचीच राहिली आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
महायुती सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमचे सरकार जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे कधीही थांबणार नाहीत. ही योजना बंद करण्यासाठी याच काँग्रेसवाल्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांना राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले पाहायचे नाही. आज ते महिलांबद्दल सहानुभूती दाखवत आहेत, पण त्यांचे हे अश्रू केवळ मगरमच्छचे अश्रू आहेत.
Navneet Rana : भाजपच्या मनात चाललय काय? नवनीत राणांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा ‘वेटिंग’वर!
राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी थेट संविधान आणि जनकल्याणकारी योजनांचे मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला राजकीय अडचणीत आणल्याचे मानले जात आहे.








