व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar : एमपीएससी पेपरफुटीत थेट सत्ताधाऱ्यांचा हात

Vijay Wadettiwar : एमपीएससी पेपरफुटीत थेट सत्ताधाऱ्यांचा हात

mpsc-paper-leak-vijay-wadettiwar-alleges-political-interference-corruption-maharashtra : विजय वडेट्टीवार यांचा सनसनाटी आरोप

Nagpur : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि गोंधळावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “एमपीएससीचा पेपर कुठल्याही ‘लव्ह स्टोरी’मुळे फुटलेला नसून, त्यामागे थेट सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार आहे,” असा सनसनाटी आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात केला.

MPSCच्या वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील अनेक महत्त्वाच्या पदांवर सत्ताधाऱ्यांचा थेट हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत, आयोगाच्या कामकाजात तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच RTO विभागातून सेवानिवृत्त झालेल्या MPSC अध्यक्षांच्या कार्यशैलीवर आणि प्रशासकीय पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कार्यकाळाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

लाखो तरुणांचे भवितव्य MPSC च्या परीक्षांशी जोडलेले आहे. मात्र, वारंवार समोर येणारे गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप आणि परीक्षा प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास डळमळीत होत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. MPSC च्या महत्त्वाच्या पदांवरील भरती प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत आयोगाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास कायम ठेवायचा असेल, तर परीक्षा प्रक्रियेत मूलभूत बदल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी MPSC च्या सर्व परीक्षा ऑनलाईनऐवजी केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच वर्ग-३ आणि वर्ग-४च्या भरतीची जबाबदारी MPSC कडे न ठेवता जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज असून, केवळ चौकशीच्या घोषणा करून विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Harshvardhan Sapkal : एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेतील घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक

आरोग्य विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांचाही वडेट्टीवार यांनी उल्लेख केला. भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या न मिळणे, न्यायालयीन याचिकांमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि पदोन्नतीतील गोंधळ यामुळे अनेक पदे रिक्त राहत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे एकीकडे बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे शासकीय विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

RTO विभागातील कथित गैरप्रकार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवायांवरही वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले. ACB च्या कारवायांचा ‘खोट्या ट्रॅपसाठी’ गैरवापर होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणावर आपले बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. दोषी अधिकाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी देण्यात आली, तर त्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे, याची चौकशी सरकारला करण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

MPSC च्या परीक्षांबरोबरच आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारने संबंधित GR रद्द केला असला, तरी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी म्हटले. “आमच्या सरकारच्या काळात आम्ही स्वतः आंदोलकांच्या दारी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवत होतो. मात्र, सध्याच्या सरकारला प्रश्न विचारणारे लोकच सहन होत नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.

आदिवासी विभागाच्या निधीच्या खर्चावरही वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. गेल्या वर्षी आदिवासी विभागाच्या तरतुदीपैकी केवळ २९ टक्के निधी खर्च करण्यात आला आणि उर्वरित निधी दुसरीकडे वळविण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने संवेदनशील भूमिका घेण्याची गरज असल्याचे सांगत, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

Nepal Floods : नेपाळमध्ये महापूर; शेकडो परदेशी नागरिक बेपत्ता, १०५ भारतीय पर्यटकांचा समावेश

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित “खाऊन-पिऊन आंदोलन करा” या वक्तव्याचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. झिरवाळ यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी, “झिरवाळ स्वतः खाऊन-पिऊनच सर्व करतात, म्हणून ते विद्यार्थ्यांना तसा सल्ला देत आहेत,” असा टोला लगावला.

MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकार, भरती प्रक्रियेतील गोंधळ, शासकीय विभागांमधील रिक्त पदे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून काँग्रेसने सरकारला घेरले आहे. या सर्व प्रश्नांवर सरकारने ठोस आणि पारदर्शक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. दरम्यान, MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील आरोपांपासून ते आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनापर्यंत उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नांवर सरकार आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे आता विद्यार्थ्यांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!