Protest in Delhi on November 1 demanding a separate OBC column in the caste-based census : जातनिहाय जनगणनेत समावेशासाठी १ नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन
Nagpur जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम असला पाहिजे, तसेच ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर १ नोव्हेंबर रोजी चलो दिल्लीचा नारा आज ओबीसी बैठकीत देण्यात आला. यासाठी व्यापक आंदोलन उभारण्यासाठी आज नागपुरात विदर्भस्तरीय ओबीसी नेते पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीनंतर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आमची स्पष्ट मागणी आहे. सरकारने जनगणनेच्या प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आली नाही, तर त्यांच्या प्रतिनिधित्वाचा आणि आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. १३ सप्टेंबर रोजी दिल्लीत देशभरातील सुमारे ६५ ओबीसी संघटनांची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी आंदोलनाची तयारीला सुरुवात झाली आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त तालुका स्तरावर सत्याग्रह, २५ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन व मोर्चे आणि त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी ‘चलो दिल्ली’चा नारा देत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनाचे स्वरूप देशभरातील संघटनांच्या संयुक्त बैठकीत निश्चित करण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही तर भविष्यात आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतंत्र कॉलमसह जातनिहाय जनगणना होणे अत्यावश्यक आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला जाब विचारला.
Devendra Fadnavis : दुष्काळी मदतीचे नियम आजचे आहेत का?; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर घणाघात
महाज्योती, बार्टी सारख्या संस्थांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, तसेच मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती यांसारख्या विषयांवर सरकारकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी समाजाच्या हक्कांशी संबंधित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या संदर्बत वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने कोणत्याही समाजाच्या हक्कातील वाटा दुसऱ्या समाजाला देऊ नये. ज्यांना आरक्षण द्यायचे असेल ते स्वतंत्रपणे द्या, मात्र ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण कुणालाही देऊ नका. आमच्या हक्कांवर गदा आली तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
दिल्लीतील आंदोलनाची रुपरेषा ही दिल्लीत ठरवली जाईल. ओबीसींच्या ६० संघटना एकत्र येऊन यावर काम करत आहे. याबाबतची अधिकची माहिती ही दिल्लीत देण्यात येईल असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवरही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राकडून मदतीची वाट पाहू नका. राज्याच्या तिजोरीतून तातडीने मदत करा. मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना ज्या मागण्या करत होते, त्याच मागण्या आता सत्तेत असताना पूर्ण कराव्यात, असे ते म्हणाले.
Chandrashekhar bawankule : येत्या दोनतीन दिवसात दुष्काळावर उपाययोजना; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी जाणाऱ्या पालकमंत्र्यांना उद्देशून वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांची परिस्थिती केवळ पाहून न जाता ती संवेदनशीलतेने समजून घेणे आवश्यक आहे. कोरड्या नजरेने पाहू नका, शेतकऱ्यांची अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात त्याचे भाव दिसले पाहिजेत. पाहणी केल्यानंतर ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही सरकारला जाब विचारू, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये आश्वासने आणि कागदपत्रांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आता जरांगे पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांवर सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास केला जाईल. त्या मागण्यांमधून ओबीसींचे हक्क हिरावले जात असतील तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमच्या वाट्याचे कुणालाही देऊ नका. ज्यांना द्यायचे आहे ते स्वतंत्रपणे द्या. आता न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत प्रामुख्याने उमेश कोर्राम, संयोजक सकल ओबीसी महामोर्चा, सदानंद इलमे, बबलू कटरे, विलास काळे, मोहन हरडे, अनिल डहाके, सतीश मालेकर, बालकृष्ण सारवे, मोंटू पिल्लारे, लोकमान्य बरडे, राजेश काकडे, वंदना वनकर, अंजली साळवे, सुषमा भड, रमेश पिसे, अशोक काकडे, पीयूष आकरे, कृतल आकरे, आणि विदर्भातील ११ जिल्ह्यातील ओबीसी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.








