Nagpur welcomed the new year with a gang war : कुख्यात हिरणवार टोळीवर अंधाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू
Gang War एखाद्या चित्रपटातील Action scene प्रमाणे ही घटना गुरुवारी (दि. 2 डिसेंबर) सायंकाळी चार वाजता घडली. शेखू टोळी आणि हिरणवार Hiranwar गटामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून छुपे टोळीयुद्ध सुरु होते. शेवटी शेखू टोळीने तीन दुचाकींनी कारचा पाठलाग करुन हिरणवार टोळीला खापरखेड्याजवळ कारमध्ये जाताना अडवले. कारवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पवन हिरणवार याच्या पाठीत गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ बंटी हिरणवार आणि एक अन्य साथिदार गंभीर जखमी आहे.
गोळीबार केल्यानंतर शेखू टोळी लगेच पळून गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून शेखू टोळी आणि पवन हिरणवार टोळी एकमेकांच्या विरोधात उभी होती. हिरणवार टोळीने शेखूच्या लहान भावाचा भरचौकात खून केला होता. त्यामुळे शेखूला हिरणवार बंधूचा ‘गेम’ करायचा होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हिरणवार बंधू एकांतात केव्हा असतील, याची वाट बघत होता.
पवन हिरणवार-बंटी हिरणवार हे दोघेही तीन साथिदारांसह गुरुवारी दुपारी बाबुलखेड्यातील पंचमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी गेले होते. पवन आणि बंटी एकाच कारमध्ये असल्याची माहिती शेखूला मिळाली. शेखू हा आपल्या पाच साथिदारांसह तीन दुचाकींनी पवनच्या मागावर निघाला. तर शेखू हल्ला करणार याबाबत अनभिज्ञ असलेला पवन हा देवदर्शन करुन कारने परत येत होता. खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोनखैरी रस्त्यावर शेखूच्या टोळीने पवनच्या कारचा पाठलाग करणे सुरु केले.
पवनची कार दिसताच शेखूच्या टोळीने पवनच्या कारवर अंधाधुंद गोळीबार करणे सुरु केले. दोन दुचाकीचालकांनी कारच्या मधोमध दुचाकी चालवून पवन हिरणवारवर गोळ्या झाडल्या. यात हिरणवारच्या पाठीत गोळ्या घुसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या बंटीवरही आरोपींनी गोळीबार केला. मात्र, त्यात बंटी थोडक्यात हुकला. गोळीबार होत असल्यामुळे चालकाने कार थांबवली. आरोपींनी चाकूनेही एका युवकावर हल्ला केला. तर कारमधील दोन युवकांनी शेखू टोळीवर प्रतिहल्ला केला. त्यामुळे शेखूने पळ काढला. झटापटीत शेखूच्या हातातील पिस्तूल घटनास्थळावर पडली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.
टीप दिल्यानंतर केला हल्ला
शहरातील गुन्हेगारांच्या काही टोळ्यावर राजकीय वरदहस्त आहे. शेखू आणि हिरणवार टोळीचेही राजकीय ‘कनेक्शन’ आहे. शेखूला हिरणवार टोळीतील एका सदस्याने पवन आणि बंटीची टीप दिली. त्यामुळेच शेखूने पाच साथिदारांसह हिरणवारच्या कारचा पाठलाग केला, अशी चर्चा आहे. या गोळीबार कांडामुळे शहरात पुन्हा टोळीयुद्ध पेटण्याची चिन्हे आहेत.