Farmer commits suicide due to lack of water for farming : शासनाच्या अनास्थेचा बळी, वारंवार मागणी करूनही मिळाले नाही खडकपूर्णाचे पाणी
Buldhana वारंवार मागणी करूनही खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी न मिळाल्याने ऐन हाेळीच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली. आरमाळ येथील ‘युवा शेतकरी पुरस्कार’ प्राप्त शेतकऱ्याने विश प्राशन करून आत्मत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कैलास अर्जुनराव नागरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कैलास नागरे यांनी शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून आत्महत्या केली. या घटनेतून शासनाची शेतकऱ्यांप्रती उदासीनता पु्न्हा सिद्ध झाली. यापूर्वी त्यांनी शासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली होती. आणि डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग उपोषण केले होते. प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने ते २६ जानेवारी रोजी पुन्हा उपोषण करणार होते. मात्र, पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनामुळे ते स्थगित करण्यात आले.
Wardha Police : १९ सीसीटीव्ही, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन!
त्यानंतर शासनाने शिवणी आरमाळ प्रकल्प दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, परंतु खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी सोडण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. शासनाच्या या उदासीनतेमुळे अखेर १३ मार्च रोजी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत प्रशासनाच्या धोरणांबद्दल तीव्र खंत व्यक्त करण्यात आली असून, खडकपूर्णा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे, ही मागणी पुन्हा अधोरेखित करण्यात आली आहे.
घटनेनंतर संतप्त शेतकरी आणि गावकऱ्यांनी ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा निर्णय घेतला. प्रशासनाकडून तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार रुपेश शक्करगे, मंडळ अधिकारी प्रल्हाद केदार आणि तलाठी अनाळकर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी लेखी हमीवर ठाम राहिले.
माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंढे यांनी ही माहिती आमदार मनोज कायंदे यांना दिली. त्यांनी तातडीने शासनाकडे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच, कैलास नागरे यांच्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, असेही सांगितले.
त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. सायंकाळी शिवणी आरमाळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कैलास नागरे यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध वडील, दोन मुली, बहीण आणि मुलगा असा परिवार आहे.