Government’s hand of ‘friendship’ for industrial development : उद्योग विभागाच्या सचिवांची ग्वाही; ‘उद्योग समस्यांचे निराकरण’ विषयावर सत्र
Nagpur उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘मैत्री 2.0’ हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकरादांना अधिक सोपी, जलद, पारदर्शक सेवा मिळणार आहे. विदर्भासह महाराष्ट्राच्या उद्योग विकासासाठी महाराष्ट्र राज्याने ‘मैत्री’चा हात पुढे केला आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी व्यक्त केले.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्यावतीने नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ – 2025’ मध्ये आयोजित ‘इंडस्ट्रीयल इश्यूज अॅड सोल्यशन’ विषयावरील सत्रात डॉ. पी. अनबलगन बोलत होते. त्यांनी विदर्भातील विविध उद्योजक व उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कार्यक्रमाला एआयडीचे अध्यक्ष आशीष काळे, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री, सचिव डॉ. विजय कुमार शर्मा, एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशने अध्यक्ष पी. मोहन, बीएमएचे अध्यक्ष डॉ. किशोर मालवीय, लघू उद्योग भारतीचे अध्यक्ष अलोक पाहुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पी. अनबलगन यांनी नागपूर, विदर्भात खूप क्षमता असून हे दशक विदर्भाच्या औद्योगिक विकासाचे आहे, असे उद्गार काढले. विदर्भात पारंपरिक उद्योगांसोबतच नवनवे उद्योग येत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. उद्योग सुरू करताना येणा-या समस्यांचे निराकरण जिल्हा पातळीवरच व्हावे आणि गाव स्तरावर उद्योजक तयार व्हावे असे सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय कुमार शर्मा व गिरधारी मंत्री यांनी केले.








