Eknath Shinde Shivsena will win 2-3 seats in legislative election, claims Bacchu Kadu : विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे २-३ आमदार निवडून येण्याचा दावा
Amravati विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला थेट मदत केली, असा आरोप करत “कहाँ गये वो कांग्रेस के वोट?” असा उपरोधिक सवाल आमदार बच्चू कडू यांनी अंजगाव मूर्ती येथे उपस्थित केला. तसेच आगामी काळात जिल्ह्यात शिंदेगटाचे दोन ते तीन आमदार निश्चित निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अण्णाभाऊ सुर्जी येथील प्रभा मंगल कार्यालयात अडत व्यापारी संघ व माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला शेतकरी, व्यापारी, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बच्चू कडू यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निवडणुकांमध्ये जात-धर्म आणि पैशाचा वाढता प्रभाव चिंताजनक असल्याचे सांगितले. “जात-धर्मापेक्षा देश महत्त्वाचा आहे. शेतकरी, जवान, कष्टकरी कामगार आणि दिव्यांग हेच समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने संघर्ष करत राहीन,” असे ते म्हणाले.
“खांद्यावर भगवा, हिरवा किंवा निळा झेंडा असो, जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी शेतकरीपुत्र असून शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष कधीही थांबवणार नाही. शेतकरी सक्षम झाला तर देशही सक्षम होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Shah Fadnavis Meeting: अमित शाह – देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत तीन तास बैठक
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश व्यास होते. यावेळी सुधाकर भारसाकळे, अजय मेहकरे, विजय भांबूरकर, शंभू मालठाणे, शंकर मालठाणे, बाळासाहेब रोंघे, सन्नी शेळके, बाला शेलकर, मुन्ना इसोकार, संदीप पाल महाराज, बाबूराव उंबरकर, नितीन चौखंडे, सचिन वाघमारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संजय चोरे, जगदीश शेळके, ज्ञानेश्वर पोटदुखे, सुधाकर खारोळे, श्यामकांत चौधरी आणि व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.








