व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chhagan bhujbal : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचे लॉबिंग तेजीत

Chhagan bhujbal : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचे लॉबिंग तेजीत

chhagan-bhujbal-rajya-sabha-lobbying-sameer-bhujbal-maharashtra-politics-news : समीर भुजबळांना मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी, राष्ट्रवादीत घराणेशाहीच्या चर्चां

Mumbai : राज्यसभेतील रिक्त झालेल्या जागेवर वर्णी लागावी यासाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध स्तरांवर चर्चांना वेग आला असून छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, राज्यसभेबरोबरच आपले पुतणे समीर भुजबळ यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी भुजबळ आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण, छगन भुजबळ हे पक्षातील ओबीसी चेहरा मानले जातात. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात त्यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका आणि ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेली आक्रमक बाजू यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. मात्र, त्यांच्या भूमिकेमुळे काही भागात पक्षाला राजकीय नुकसान सहन करावे लागल्याची भावना पक्षातील काही नेत्यांमध्ये होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बैठकीत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. काही नेते विशिष्ट समाजाविषयी टोकाची भूमिका घेत असल्याने पक्षाची प्रतिमा प्रभावित होत असल्याचे त्यांनी सूचित केले होते.

Ramdas Athavale: आरपीआय विधान परिषद लढणार नाही; मात्र राज्यपाल कोट्यातून एका जागेवर रामदास आठवलेंचा दावा

दरम्यान, छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासोबतच समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देण्याच्या चर्चेमुळे पुन्हा घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, भुजबळ समर्थकांनी यावर प्रत्युत्तर देताना पक्षातील इतर नेत्यांची उदाहरणे पुढे केली आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले, सुनील तटकरे खासदार असतानाच त्यांच्या मुलीला राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, तसेच पवार कुटुंबातील इतर सदस्यांनाही विविध पदांवर संधी देण्यात आली. मग भुजबळ कुटुंबाबाबत वेगळे निकष का लावले जात आहेत, असा सवाल समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.

Vidarbha Farmers : एचटीबीटी बियाणांचा साडेचार लाखांचा साठा जप्त; कृषी विभागाची संग्रामपूर तालुक्यात कारवाई

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत समतोल राखण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर उभे राहिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदलते राजकीय समीकरण लक्षात घेता ओबीसी नेतृत्व नाराज होणार नाही, याची काळजी पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेवर अखेर कोणाची निवड होते आणि समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळते का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!