jayant-patil-vinod-tawde-secret-meeting-devendra-fadnavis-reaction-sharad-pawar : जयंत पाटील – विनोद तावडे भेटीने राजकारणात खळबळ
Mumbai: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या भेटीनंतर शरद पवार गट महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीमध्ये सहभागी होणार का, अशा चर्चांना जोर आला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय समीकरणांबाबत भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्रातून एनडीएमध्ये कोणताही नवीन पक्ष येणार नाही. सध्या जे पक्ष एनडीएमध्ये आहेत, तेच पुढेही राहतील. नवीन पक्षाला एनडीएमध्ये सामील करून घेण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
Sudhir Mungatiwar: मुनगंटीवारच चॅम्पियन! तगड्या मांडणीसमोर सरकारलाही द्यावे लागले सकारात्मक आश्वासन
याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदारांना फोडण्याचा भाजपचा कोणताही प्रयत्न नसल्याचेही स्पष्ट केले. “शरद पवार यांच्या पक्षातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही,” असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भविष्यात महायुतीत सहभागी झाल्यास संभाव्य राजकीय समीकरणे, सत्तेतील भूमिका आणि पक्षाच्या वाट्याला येऊ शकणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षातील एका वरिष्ठ नेत्यासोबतही स्वतंत्र चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांची भेट झाल्याचे मान्य केले. मात्र, ही भेट पूर्णपणे अनौपचारिक असून त्यामध्ये कोणताही राजकीय निर्णय किंवा ठोस चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीमुळे महाविकास आघाडीतील भविष्यातील समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गट तातडीने महायुतीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या तरी अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आणि राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे विधानसभेत जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार, रोहित पाटील, संदीप रवींद्र क्षीरसागर, नारायण गोविंदराव पाटील, अभिजीत पाटील, राजू ज्ञानू खरे, उत्तमराव शिवदास जानकर आणि बापूसाहेब तुकाराम पाठारे यांसारखे आमदार आहेत. तर लोकसभेत सुप्रिया सुळे, अमर शरदराव काळे, भास्कर भगरे, सुरेश म्हात्रे, निलेश ज्ञानदेव लंके, डॉ. अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते-पाटील आणि बजरंग सोनवणे हे पक्षाचे खासदार प्रतिनिधित्व करत आहेत.
Devendra fadnavis : विरोधकांच्या मेंदूतून अक्कलच ‘मिसिंग’ मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर !
जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीने निर्माण झालेल्या राजकीय चर्चांमुळे महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांबाबत उत्सुकता वाढली असली, तरी अधिकृत पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार गटाची भूमिका आणि महाविकास आघाडी तसेच महायुतीतील राजकीय घडामोडी राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








