demand of accidental Insurace for Govinda Pathak : अपघातांच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र राज्य कावडधारक समूह अपघात विमा योजना’ लागू करण्याची मागणी
Akola अकोल्यातील ऐतिहासिक श्रावण कावड महोत्सवात सहभागी होणाऱ्या हजारो शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी दहीहंडीतील गोविंदा पथकांना लागू असलेल्या समूह अपघात विमा संरक्षणाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र राज्य कावडधारक समूह अपघात विमा योजना’ तातडीने लागू करावी, अशी मागणी गटनेते तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्रावण महिन्यात भगवान महादेवांप्रती असलेल्या श्रद्धेपोटी राज्यभरातून लाखो शिवभक्त कावड यात्रा करतात. अकोल्यातील ऐतिहासिक कावड महोत्सवाला अनेक दशकांची परंपरा असून, जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून हजारो कावडधारक या यात्रेत सहभागी होतात. अनेक किलोमीटर पायी प्रवास करून पवित्र जल आणून भगवान महादेवांचा जलाभिषेक करण्याची ही धार्मिक परंपरा आहे. या यात्रेदरम्यान कावडधारकांना मोठ्या शारीरिक कष्टांचा सामना करावा लागतो.
निलेश देव यांनी सांगितले की, कावडधारकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत त्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत मागील सहा वर्षांपासून कावड महोत्सवादरम्यान ‘आपला दवाखाना’ योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून कावडधारकांना मोफत वैद्यकीय तपासणी, प्राथमिक उपचार, औषधोपचार आणि आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे अनेक शिवभक्तांना वेळेवर उपचार मिळाले आहेत.
मात्र, केवळ प्राथमिक आरोग्य सेवा पुरेशी नसून अपघातानंतर आर्थिक संरक्षण मिळणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील वर्षी कावड यात्रेदरम्यान दोन गंभीर अपघात घडले होते. त्यापैकी एका कावडधारकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर दीर्घकाळ उपचार करावे लागले. अशा घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडतो. बहुतांश कावडधारक सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने उपचाराचा अचानक येणारा खर्च पेलणे कठीण जाते, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने दहीहंडी उत्सवातील गोविंदा पथकांसाठी समूह अपघात विमा संरक्षणाची योजना लागू केली आहे. त्याच धर्तीवर श्रावण महिन्यात शेकडो किलोमीटर पायी चालत धार्मिक परंपरा जपणाऱ्या कावडधारकांनाही समान संरक्षण मिळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यासोबतच कावडधारकांची नोंदणी करून स्वतंत्र विमा यंत्रणा विकसित करावी, अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या घटनांमध्ये संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, अशी प्रभावी विमा योजना राबवावी, अशीही मागणी निलेश देव यांनी केली आहे.
ही योजना लागू झाल्यास हजारो शिवभक्त कावडधारकांना सुरक्षिततेचे संरक्षण मिळेल आणि अकोल्यातील ऐतिहासिक श्रावण कावड महोत्सव अधिक सुरक्षित व सुव्यवस्थित वातावरणात पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.








