ladki-bahin-yojana-92-lakh-beneficiaries-removed-after-ekyc-verification-beed-highest : इ केवायसी नंतर ९२ लाखांहून अधिक लाभार्थी अपात्र
Mumbai : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ संदर्भात मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. लाभार्थ्यांच्या पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर तब्बल ९२ लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुमारे ८० लाख लाभार्थी अपात्र ठरतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अंतिम छानणीत हा आकडा ९२ लाखांच्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.
या छानणीत सर्वाधिक लाभार्थी अपात्र ठरलेल्या जिल्ह्यांमध्ये बीड आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, एकट्या बीड जिल्ह्यातील सुमारे २८ लाख लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. मात्र, तांत्रिक कारणांमुळे किंवा चुकीने नावे वगळली गेली असल्याची तक्रार करणाऱ्या महिलांच्या अर्जांची स्वतंत्र पडताळणी केली जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारने योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे, ई-केवायसी पूर्ण करणे आणि पात्रतेच्या निकषांची पुन्हा तपासणी करण्याची प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थी आवश्यक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत किंवा ई-केवायसी पूर्ण करू शकले नाहीत. परिणामी, अशा लाभार्थ्यांचे हप्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
छानणीत आणखी काही महत्त्वाची कारणेही समोर आली आहेत. सुमारे १२ लाख महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. तसेच ४.५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे त्या योजनेच्या पात्रतेच्या निकषांबाहेर असल्याचे स्पष्ट झाले.
धक्कादायक बाब म्हणजे, या योजनेसाठी पुरुषांनीही अर्ज केल्याचे पडताळणीत उघड झाले आहे. अधिकृत माहितीनुसार, सुमारे १४ हजार पुरुषांची नावे लाभार्थी यादीत आढळून आली होती. तपासणीनंतर त्यांचे अर्ज तात्काळ रद्द करण्यात आले असून त्यांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांचा ऐतिहासिक विक्रम
दरम्यान, चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरल्याचा दावा करणाऱ्या महिलांना तक्रार नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. संबंधित प्रकरणांची फेरतपासणी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजनांपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने तील ही मोठी छानणी असल्याने लाखो लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पुढील काळात पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होण्याकडे राज्यभरातील महिलांचे लक्ष लागले आहे.








