Those who resigned out of support for Nazer Kazi suddenly fall silent : नाझेर काझींच्या प्रेमापोटी राजीनामा देणारे अचानक झाले शांत
Buldhana राजकारणात राजीनामे हे एकेकाळी असंतोष व्यक्त करण्याचे प्रभावी साधन मानले जात होते; मात्र सध्याच्या घडामोडी पाहता ते आता ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा भाग बनल्याची टीका होत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात अलीकडे घडलेला प्रकारही असाच आहे. अॅड. नाझेर काझी यांना विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच २० पदाधिकाऱ्यांचे ‘भावनिक’ राजीनामे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच वातावरण शांत झाले आणि सगळे काही पूर्ववत झाल्याचे दिसून आले. एखाद्या मालिकेचा ‘सीझन फिनाले’ संपून ब्रेक लागल्याप्रमाणे सध्याचे वातावरण आहे.
या संपूर्ण प्रकरणात काझी यांचा थेट सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी कथानकातील खरा ‘ट्विस्ट’ वेगळाच आहे. पक्षाने पाठवलेल्या पाच नावांच्या यादीत काझी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. म्हणजेच ते ‘रनर-अप’ ठरले; मात्र अंतिम क्षणी समीकरण बदलले आणि दुसऱ्याच उमेदवाराला संधी मिळाली. पक्षांतर्गत चर्चेनुसार, दोन वरिष्ठ नेत्यांनी पडद्यामागून सूत्र हलवून अंतिम निर्णयावर प्रभाव टाकल्याची चर्चा आहे. परिणामी, काझी यांना ‘पॅव्हेलियन’मध्ये परतावे लागले.
Bacchu Kadu : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना साकडे
दरम्यान, या अचानक उसळलेल्या असंतोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या ‘क्रायसिस मॅनेजमेंट’चीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे बंड लवकर शांत झाले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींमुळे पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत ‘बॅकस्टेज स्क्रिप्ट रायटर्स’चा प्रभाव अजूनही कायम असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आता या राजकीय कथानकाचा पुढील ‘क्लायमॅक्स’ राज्यपाल नियुक्त आमदारकीभोवती फिरत आहे. त्या यादीत काझी यांचे नाव समाविष्ट होणार का, की पुन्हा एकदा ‘एडिट’ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, राजीनामा नाट्य जरी संपले असले, तरी त्यामागची ‘स्क्रिप्ट’ अजून पूर्ण झालेली नाही, हेच या घटनाक्रमातून अधोरेखित होते.








