Chief Minister Has Become the Big Boss’; Growing Discontent in Mahayuti, Alleges Shashikant Shinde; Announces ‘Unemployed Elgar Tiranga Rally : हाताला काम द्या, कागदी घोडे नाचवू नका’; स्मार्ट मीटरवरही सरकारला धारेवर धरले
Nagpur : राज्य शासनामध्ये अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांना सर्वच विभागांचे निर्णय फिरवण्याचे अमर्याद अधिकार बहाल करण्यात आले असून, यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका ‘बिग बॉस’सारखी झाली आहे. या एकछत्री कारभारामुळे महायुती सरकारमधील घटक पक्ष आणि मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी व अस्वस्थता पसरल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुती सरकारमध्ये कुठेही एकवाक्यता उरलेली नसून, कोणत्याही विभागाचा अंतिम निर्णय केवळ मुख्यमंत्रीच घेत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील तरुण नोकरीअभावी हवालदिल झाला असून, सरकार अप्रेंटिसशिप आणि पॅकेजच्या नावाखाली युवा वर्गाची दिशाभूल करत आहे. कायमस्वरूपी नोकरभरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे तरुणांमध्ये तीव्र संताप आहे. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील ६ विभागांमध्ये भव्य बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली काढून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच नवीन येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनाच रोजगारात प्राधान्य मिळाले पाहिजे; केवळ जीआर काढून कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष हाताला काम द्या, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच, राज्यात जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या ‘स्मार्ट मीटर’वरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडले. विधानसभेत स्मार्ट मीटरबाबत कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, मात्र आता अधिकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट देऊन घरोघरी, अगदी नागरिक घरी नसतानाही जबरदस्तीने मीटर लावले जात आहेत. या स्मार्ट मीटरमुळे नागरिकांचे वीज बिल दुप्पट येत असून, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असल्याने पक्षाचा स्मार्ट मीटरला तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








