devendra-fadnavis-big-disclosure-on-ajit-pawar-plane-crash-dgca-cid-probe : “त्या विमानातून मीही चार-पाच वेळा प्रवास केला”, चौकशी सुरू असल्याची माहिती
Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानाचे बारामती धावपट्टीवर उतरताना नियंत्रण सुटल्याने ते जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर स्फोट होऊन विमानाला आग लागल्याची माहिती समोर आली होती.
या अपघाताबाबत काही राजकीय नेत्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, हा अत्यंत दुर्दैवी अपघात असून संपूर्ण राज्य अजूनही धक्क्यात आहे. सर्वप्रथम कुटुंबियांच्या दु:खाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. मात्र या घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या अपघाताची चौकशी नागरी उड्डाण महासंचालनालय मार्फत सुरू आहे. राज्य सरकारने सीआयडीमार्फतही तपास सुरू केला होता. त्यानंतर संबंधित पक्षाकडून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली असून सर्व बाजूंनी सत्य समोर यावे, हीच सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. चौकशीअंती जे निष्कर्ष समोर येतील त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Criticism on ruling party : विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन म्हणजे लोकशाहीची विटंबना !
दरम्यान, काही नेत्यांनी विमानाच्या तांत्रिक बिघाडाबाबत तसेच इतर शक्यतांबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, कोणाच्या मनात शंका असू शकते; मात्र त्या अधिकृत यंत्रणांकडेच नोंदवाव्यात. डीजीसीए किंवा राज्य सरकारकडे लेखी स्वरूपात शंका मांडल्यास त्यांची दखल घेतली जाईल. प्रत्येक शंकेचे निरसन चौकशीद्वारे झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानाच्या सुरक्षिततेविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, संबंधित कंपनीच्या विमानातून देशातील अनेक नेते प्रवास करत असतात. “दादांचा अपघात झाला त्या विमानातून मी स्वतः चार ते पाच वेळा प्रवास केला आहे,” असे सांगत त्यांनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत चौकशी अहवालाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन केले. अपघाताच्या संदर्भात अजित पवार यांच्या सन्मानाला धक्का पोहोचेल किंवा त्यांच्या कुटुंबाला त्रास होईल अशा पद्धतीने कोणीही वक्तव्य करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
February forecast : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट;रब्बी पिकांवर संकटाची छाया
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, चौकशी अहवालात नेमके काय निष्कर्ष समोर येतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सरकारने पारदर्शक तपासाचे आश्वासन दिले असून, अधिकृत अहवालानंतरच अपघाताच्या कारणांबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.








