ncp-sunil-tatkare-praful-patel-post-row-election-commission-letter-2026 : निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे राजकीय खळबळ
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये पुन्हा एकदा अंतर्गत राजकारण आणि गटबाजीची चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रातून मोठी माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पत्रात खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावांसमोर अनुक्रमे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशी पदे नमूद करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हे दोन्ही नेते अद्याप त्या पदांवर कायम आहेत की नाहीत, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. या यादीत अरुणाचल प्रदेशचे नेते टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र त्याच पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यांच्या नावासमोर केवळ लोकसभेचे गटनेते असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पक्ष संघटनेतील त्यांच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
त्याचप्रमाणे प्रफुल पटेल यांच्या नावासमोरही राष्ट्रीय कार्याध्यक्ष असा उल्लेख नसून केवळ राज्यसभेचे गटनेते अशी नोंद करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च संघटनात्मक रचनेत काही बदल झाले आहेत का, की ही केवळ तांत्रिक चूक आहे, असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना या पत्रामध्ये तांत्रिक आणि क्लरिकल त्रुटी असल्याचे सांगितले होते. संबंधित चुका लवकरच दुरुस्त केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र पाच दिवस उलटल्यानंतरही निवडणूक आयोगाकडे सुधारित पत्र सादर झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद होत असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी’च्या उंबरठ्यावरच ‘भोंदूगिरी’चा पहारा? गणेशपेठेतील पक्ष कर्यालयातील ‘यंत्रा’ने खळबळ!
विशेष म्हणजे, याआधी मार्च महिन्यातही निवडणूक आयोगाला दिलेल्या एका पत्रात अशाच प्रकारचा गोंधळ झाल्याची चर्चा होती. त्यामुळे वारंवार केवळ सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांबाबतच चुका कशा होतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पक्षांतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील संघर्षाचीही चर्चा यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.
या पत्रात पक्षाचे सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तटकरे आणि पटेल यांना पक्ष संघटनेतून जाणीवपूर्वक डावलले जात आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेषतः पार्थ पवार आणि या दोन वरिष्ठ नेत्यांमधील कथित शीतयुद्धाच्या चर्चांनाही या घडामोडींमुळे पुन्हा हवा मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील या नव्या वादामुळे आगामी काळात पक्षांतर्गत समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातील ही चूक केवळ तांत्रिक होती की त्यामागे मोठे राजकीय संकेत दडले आहेत, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
___








