पद हे त्यांच्यासाठी कधीच ध्येय नव्हते… पदाच्या माध्यमातून विकास घडवणे, हेच त्यांचे ध्येय राहिले. मंत्री म्हणून निर्णय घेतले, आमदार म्हणून ते निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी संघर्ष केला. चंद्रपूरच्या मातीशी असलेले नाते आणि विकासाची असलेली जिद्द आजही तितकीच कायम आहे. सुधीर मुनगंटीवार… नाव एक, भूमिका अनेक; पण ध्यास एकच… चंद्रपूरचा सर्वांगीण विकास!
राजकारणात काही चेहरे काळाच्या ओघात धूसर होतात. काही चेहरे एखाद्या पदाच्या प्रभावामुळे मोठे दिसतात. पण काही मोजकी व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांच्यासाठी पद हे केवळ एक साधन असते; त्यांची खरी ओळख कर्तृत्वाने बनलेली असते. सुधीर मुनगंटीवार यांचा राजकीय प्रवास या तिसऱ्या, म्हणजेच सर्वात प्रभावी प्रकारात मोडतो.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी आमदार, मंत्री आणि विविध धोरणात्मक खात्यांचं नेतृत्व केलं. वने, अर्थ, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय अशा भिन्न स्वभावाच्या क्षेत्रांत काम करताना प्रत्येक खात्याची आव्हाने वेगळी होती. मात्र, या सर्व प्रवासात एकच सूत्र कायम राहिले ते म्हणजे विषयाचा सखोल अभ्यास, धाडसी निर्णय आणि निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत त्याचा अविरत पाठपुरावा.
आज जेव्हा सुधीर मुनगंटीवार विधानसभेत बोलण्यासाठी उभे राहतात, तर त्यांच्या मागे केवळ एका मतदारसंघापुरता विचार नसतो; त्यांच्यामागे असतो प्रदीर्घ संसदीय अनुभव, प्रशासनाची सूक्ष्म जाण आणि अभ्यासू राजकारणाची भक्कम ढाल. ते जेव्हा सभागृहात मुद्दा मांडतात, तेव्हा केवळ मागण्यांची यादी ठेवत नाहीत, तर त्यामागील जनतेची व्यथा, तांत्रिक बाजू आणि त्याचे दूरगामी परिणाम सभागृहाच्या पटलावर मांडतात. आकडेवारी आणि वस्तुस्थितीची अचूक मांडणी ही त्यांच्या प्रत्येक भाषणाची खरी ताकद ठरते. म्हणूनच विधानसभेतील त्यांची भूमिका एका साध्या आमदारापुरता मर्यादित राहत नाही; ती एका कसलेल्या, अभ्यासू लोकनेत्याची भूमिका ठरते. त्यांच्या प्रत्येक मांडणीच्या केंद्रस्थानी असते ते चंद्रपूरच्या मातीशी असलेले त्यांचे घट्ट नाते. त्यामुळेच त्यांच्या आकडेवारीच्या मागेही चंद्रपूरच्या सामान्य माणसाचा चेहरा स्पष्ट दिसतो.
Eknath Shinde : शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्या
सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय प्रवासाची ताकद, त्यांची निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी समजून घ्यायची असेल, तर त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील ऐतिहासिक आणि धोरणात्मक निर्णयांकडे पाहणे आवश्यक ठरते. शेकडो निर्णयांनी प्रशासनाला नवी दिशा देताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीवर कायमस्वरूपी ठसा उमटवला. त्यापैकी हे पाच निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दूरदृष्टी, धाडसी निर्णयक्षमता आणि परिवर्तन घडवण्याची क्षमता अधोरेखित करणारे ठरले.
१. वनमंत्री म्हणून त्यांनी राबवलेली वृक्षलागवडीची मोहीम ही केवळ एक सरकारी योजना नव्हती, तर ती एक जागतिक लोकचळवळ बनली. १ जुलै २०१६ रोजी महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल २.८१ कोटी रोपांची लागवड करून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली. त्यानंतर तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे महाकाय ध्येय गाठून त्यांनी महाराष्ट्राचे हरित आच्छादन वाढवले. वृक्षारोपणाचा विषय सरकारी फायलींमधून बाहेर काढून जनमानसात रुजवणारा हा प्रयोग ऐतिहासिक ठरला.
२. “वन म्हणजेच केवळ झाडे नव्हेत, तर वन्यजीव आणि त्यांचे रक्षण करणारे कर्मचारीही तितकेच महत्त्वाचे आहेत,” ही संवेदनशील दृष्टी त्यांनी दाखवली. जंगलांचे रक्षण करताना प्राणांची बाजी लावणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या धर्तीवर आर्थिक व सामाजिक संरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. कर्तव्य बजावताना हुतात्मा झाल्यास कुटुंबाला २५ लाखांची मदत, अनुकंपा तत्त्वावर नोकरी आणि उपचारांचा पूर्ण खर्च शासनाने उचलण्याची तरतूद करून त्यांनी वन कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले.
Sir Voter List : ९० विधानसभा मतदारसंघांत ‘एसआयआर’चा मोठा धक्का;
३. महाराष्ट्राचा इतिहास आणि सांस्कृतिक अस्मिता जगासमोर आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या अजरामर गीताला महाराष्ट्राचे अधिकृत ‘राज्यगीत’ म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच काळात झाला. शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष ज्या पद्धतीने महाराष्ट्रात साजरे झाले, त्याने अख्ख्या जगाचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी रायगडावर अभूतपूर्व आणि न भूतो न भविष्यती असा सोहळा आयोजित केला गेला. लोककलावंत आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला त्यांनी नवी दिशा दिली.
४. प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाची धडाडी असो वा अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूर-गडचिरोलीच्या जंगलातील सर्वोच्च दर्जाचे सागवान लाकूड पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय असो; मुनगंटीवार कायम आघाडीवर राहिले. मार्च २०२३ मध्ये चंद्रपूरहून अयोध्येकडे सागवानाची पहिली खेप रवाना झाली, तेव्हा आयोजित शोभायात्रा ही चंद्रपूरच्या वनसंपदेचा एक भव्य उत्सव ठरली.
५. मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मच्छीमारांच्या आर्थिक स्थैर्यावर भर दिला. डिझेल परताव्याचा दीर्घकालीन प्रश्न असो की पायाभूत सुविधांचा विकास; निर्णय कागदावर न ठेवता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची शैली येथेही उठून दिसली.
अभ्यासू वक्तृत्व: विधानसभेतील बुलंद आवाज!
मंत्री असताना थेट निर्णय घेण्याचे अधिकार असतात; पण आमदार असताना ते निर्णय शासनाकडून करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. विधानसभेत मुनगंटीवारांची हीच अभ्यासपूर्ण आक्रमकता दिसून येते. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, चंद्रपूरच्या निधीचा विषय असो की प्रशासकीय त्रुटी; मुनगंटीवार थेट समस्येच्या मुळावर बोट ठेवतात. त्यांची आकडेवारी ही केवळ प्रभावासाठी नसते, तर ते एका संक्षिप्त धोरणपत्रासारखे असते. त्यामुळेच जेव्हा मुनगंटीवार विधानसभेत उभे राहतात, तेव्हा संपूर्ण प्रशासन आणि सरकारला त्यांची गंभीर दखल घ्यावीच लागते.
चंद्रपूर: कोळशाच्या ओळखीपासून ‘स्मार्ट’ विकासाकडे!
चंद्रपूरची ओळख केवळ कोळसा आणि विजेपुरता मर्यादित न ठेवता त्याला उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्याचे हब बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. ताडोबाची निसर्गसंपदा, कृषी आणि तरुण शक्तीला एकत्र जोडून चंद्रपूरचा ‘मास्टर प्लान’ त्यांनी तयार केला आहे. त्यांच्या दृष्टीने विकास म्हणजे केवळ रस्ता बांधणे नव्हे; तर त्या रस्त्यामुळे बाजारपेठ जोडली जाणे, स्थानिक तरुणांना रोजगार मिळणे आणि उद्योगांना चालना मिळणे हा आहे. मंत्री म्हणून फाईलच्या पलीकडची प्रक्रिया अनुभवलेला हा नेता आज आमदार म्हणून प्रशासनाकडून चंद्रपूरच्या विकासाची कामे वेगाने करून घेत आहे.
संघटन हेच सामर्थ्य: कार्यकर्त्यांशी थेट संवाद!
अनेक नेते पदे मिळाल्यानंतर संघटनेपासून आणि कार्यकर्त्यांपासून दूर जातात; पण सुधीर मुनगंटीवार त्याला अपवाद ठरले. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षसंघटनेची पायाभरणी अत्यंत भक्कम केली आहे. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत थेट संवाद. निवडणुका असोत वा नसोत, जनतेच्या सुख-दुःखात आणि प्रश्नांत सतत पाठीशी उभे राहण्याची त्यांची वृत्ती आहे.
पुढची गरुडझेप…
चंद्रपूरच्या विकासाचा पाया त्यांनी आधीच भक्कम रचला आहे. आता वन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या जोरावर चंद्रपूरला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्याचा त्यांचा ठाम संकल्प आहे. प्रदीर्घ संसदीय अनुभव, प्रशासनाची पकड आणि जनतेशी असलेले रक्ताचे नाते यांच्या बळावर चंद्रपूरच्या विकासाची पुढची गरुडझेप घेण्यासाठी ते आजही नव्या ऊर्जेने सज्ज आहेत.
आतापर्यंतच्या कर्तृत्वाने चंद्रपूरच्या विकासाचा इतिहास घडवला आहे; आता त्याच कर्तृत्वाच्या, अनुभवाच्या आणि दूरदृष्टीच्या बळावर चंद्रपूरचे भविष्य अधिक भव्य, अधिक सक्षम आणि अधिक दिव्य घडवण्याचा संकल्प आहे. विकासाची ही वाटचाल आता नव्या वेगाने पुढे नेणार, चंद्रपूरला उद्योग, रोजगार, शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि नव्या संधींच्या क्षेत्रात नवी उंची देणार. इतिहास घडवणारे कर्तृत्व आता भविष्य घडवणार आहे… न भूतो, न भविष्यती… कारण मुनगंटीवार कधीच थांबणार नाहीत.








