Ashok chavhan says coming together of both factions of the Nationalist Congress Party NCP is welcome : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास स्वागतच – अशोक चव्हाण; काँग्रेसच्या सद्यस्थितीवरही भाष्य
Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राजकीय सौदा कधीच घाट्याचा असू शकत नाही, असे सूचक विधान करत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीतील विसंवाद, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यता आणि काँग्रेसच्या सद्यस्थितीवर सडेतोड भाष्य केले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्याची प्रशंसा केली असताना चव्हाण यांच्या वक्त्यव्याने अनेकांच्या भुव्हाया उंचावल्या आहेत.
सध्या अमेरिका आणि इराण युद्धाचे चटके भारताला बसत असून देशात इंधनाची अभूतपूर्व टंचाई आणि प्रचंड महागाई निर्माण झाली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, देश संकटात असताना आमचे पंतप्रधान देशवासीयांना काटकसरीचा सल्ला देऊन स्वतः विदेश दौऱ्यावर निघून गेले आहेत, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. मात्र, राहुल गांधींच्या या भूमिकेच्या अगदी उलट प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांची आणि कार्यपद्धतीची प्रशंसा केली. शरद पवारांच्या या मोदी स्तुतीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींच्या टीकेचा समाचार घेत, जागतिक स्तरावर भारताचे संबंध दृढ व्हावे यासाठीच हे परदेश दौरे असतात, त्यामुळे या विषयावर कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला विरोधकांना दिला.
Neet paper scam : नीट पेपरफुटीचे नागपूर कनेक्शन; १ हजार विद्यार्थ्यांना पेपर विकल्याचा संशय
दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येणार का? यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यावर मी बोलणे योग्य नाही. परंतु राजकीय क्षेत्रात काहीतरी चांगलं घडावं असं आमचं मत आहे. आज महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष आमच्यासोबत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येऊन जर त्यांची ताकद वाढत असेल तर ते महायुतीसाठी नक्कीच चांगलं आहे. याच मुद्द्यावर पुढे बोलताना त्यांनी, शरद पवारांचा सौदा कधीच घाट्याचा असू शकत नाही, अशी मिश्कील टिप्पणीही केली.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या मायावतींच्या भेटीवर चव्हाणांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसचे सध्याचे सर्व कामकाज पूर्णपणे दिशाहीन झाले आहे. राजकीय घडामोडींमध्ये पक्षाला फारसे यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समोर जे काही पर्याय उपलब्ध असतील, त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेसकडून केला जात आहे. एकीकडे महाविकास आघाडीत राहुल गांधी आणि शरद पवारांच्या भूमिकेत तफावत दिसत असताना, दुसरीकडे अशोक चव्हाणांनी पवारांच्या राजकीय चालींवर केलेले हे विधान सध्या राजकारणात चांगलंच गाजत आहे.








