Caste-based census will be conducted; there is no need for agitation, clarifies Dr. Babanrao Taywade, National President of the OBC Federation : ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केली भूमिका
Nagpur केंद्र सरकारतर्फे प्रस्तावित जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) समाविष्ट करण्यात आलेला नाही, असा आरोप करत विरोधी पक्षांकडून रान उठवले जात आहे. काँग्रेस व इतर घटक पक्षांतर्फे विदर्भासह राज्यात ‘मंडल यात्रा’ काढून आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.
केंद्र सरकारने केवळ घोषणा करून ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याचा आरोपही या वेळी केला जात आहे. मात्र, या सर्व राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना अत्यंत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. जनगणनेच्या प्रक्रियेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या ४० प्रश्नांच्या टप्प्यात ओबीसींच्या नोंदीचा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे. जातनिहाय जनगणना होणार असून त्यात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना असणार आहे; त्यामुळे आता या विषयावर आंदोलनाची औचित्य उरलेले नाही, असे डॉ. तायवाडे यांनी ठामपणे सांगितले.
स्वातंत्र्यापूर्वी १९३१ मध्ये झालेल्या जनगणनेनंतर देशात ओबीसींची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. गेली अनेक दशके ओबीसी समाज ५२ टक्के लोकसंख्येचा जुनाच आकडा गृहीत धरून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गेल्या दशकभराहून अधिक काळ नागपूर ते दिल्ली असा प्रदीर्घ संघर्ष केला. केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करणे आणि राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करणे या महासंघाच्या प्रमुख मागण्या राहिल्या आहेत.
सध्या काँग्रेसच्या पुढाकाराने दिल्लीतील जंतर-मंतर ते विविध राज्यांत निदर्शने करत मंडल यात्रांच्या माध्यमातून हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केले की, जेव्हा प्रत्यक्ष अधिकृत प्रश्नावलीतच ओबीसी गणनेची तरतूद करण्यात आली आहे, तेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणे गैरसमजातून किंवा राजकीय हेतूने प्रेरित आहे. काही दिवसांपूर्वी महासंघानेही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र केंद्र सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि तांत्रिक बाबी स्पष्ट झाल्यानंतर महासंघाने समाधानाची भूमिका घेतली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिल नसून समाजाचे हित साध्य झाले असल्याने कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या आंदोलनांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तायवाडे यांच्या या स्पष्टीकरणामुळे विदर्भातील राजकीय वर्तुळात आणि ओबीसी चळवळीत नव्या चर्चेला उधाण आले असून विरोधी आंदोलनातील हवा निघून गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.








