bjp-maharashtra-cell-in-charge-list-new-appointments : नव्या चेहऱ्यांकडे धुरा, कोणाला कोणती जबाबदारी?
Mumbai : महाराष्ट्र भाजपने पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा फेरबदल केला असून विविध क्षेत्रातील प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांशी थेट संपर्क वाढविणे आणि पक्षाचा संघटनात्मक विस्तार मजबूत करणे, या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
केंद्रीय पातळीवर भाजपच्या संघटनेत बदल झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही पक्षाने विविध आघाड्या, सामाजिक घटक आणि व्यावसायिक क्षेत्रांशी संबंधित क्षेत्राची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. या माध्यमातून संबंधित क्षेत्रातील नागरिक, संस्था आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याचे काम केले जाते. त्यामुळे आगामी काळातील भाजपच्या संघटनात्मक रणनीतीमध्ये या नियुक्त्या महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता आहे.
भाजपने जाहीर केलेल्या नियुक्त्यांनुसार विधी प्रकोष्ठाची जबाबदारी भूषण महाडिक यांच्याकडे देण्यात आली आहे. बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे प्रभारी म्हणून विश्वास पाठक यांची नियुक्ती करण्यात आली असून ते पक्षाच्या मुख्यालयाशी संबंधित सहप्रभारीची जबाबदारीही सांभाळणार आहेत. उद्योग प्रकोष्ठाची धुरा प्रदेश सह-कोषाध्यक्ष आमदार अरुण लखानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कक्षासाठी डॉ. भारती पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकाराची जबाबदारी विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. सांस्कृतिक विभागाचे नेतृत्व सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार करणार आहेत. शिक्षक क्षेत्रासाठी सुनील लोंढा यांची नियुक्ती करण्यात आली असून व्यापार विभागाची जबाबदारी मुंबईचे कोषाध्यक्ष किरीट भंसाली यांच्याकडे देण्यात आली आहे.
Amravati fire accident : काळजाचा तुकडा विझला; आता तरी यंत्रणेचे डोळे उघडणार का?
आर्थिक विषयासाठी मिलिंद कानडे, मच्छीमार क्षेत्रासाठी चेतन पाटील, बुनकर क्षेत्रासाठी मनोज द्विवटे आणि कामगारासाठी मिलिंद तुळसकर यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विभागाची जबाबदारी आर. डी. यादव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भटके-विमुक्त क्षेत्रासाठी प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिव्यांग क्षेत्राची जबाबदारी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आली असून जयसिंग कुणावर चव्हाण यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आध्यात्मिक समन्वय क्षेत्राचे काम तुषार भोसले पाहणार आहेत. ट्रान्सपोर्ट विभागाची जबाबदारी अनूप मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
पदवीधर क्षेत्रासाठी पुन्हा सुनील लोंढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय विभागाचे प्रभारी राजेश पिल्ले, तर ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ विभागाचे प्रभारी अल्पा अगरवाल असतील. जैन समाज विभागाची जबाबदारी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सेवाभावी संस्था अर्थात स्वयंसेवी संस्था संपर्क क्षेत्रासाठी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते विभागाचे काम आमदार सुनील कर्जतकर पाहणार आहेत. आयुष्मान भारतसाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागची जबाबदारी सुधाकर भोंयर यांच्याकडे देण्यात आली आहे.
पक्षाच्या डिजिटल आणि प्रचार यंत्रणेलाही या फेरबदलात महत्त्व देण्यात आले आहे. सोशल मीडिया विभागाची जबाबदारी प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांच्याकडे देण्यात आली आहे. ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ विभागासाठी राष्ट्रीय महिला मोर्चाच्या कार्यसमिती सदस्या उषा वाजपेयी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती-तंत्रज्ञान अर्थात आयटीचे काम तेजस मालवीया पाहणार आहेत.
क्रीडा विषयासाठी केदार जाधव, बंगाली विभागासाठी शुभानत दास आणि रेल्वे प्रवासी विषयासाठी कैलास वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभियंता विभागाची जबाबदारी आमदार व प्रदेश चिटणीस प्रशांत ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे. राजस्थानी विभागाचे प्रभारी देवसिंग पुरोहित असतील.
मीडियाची महत्त्वाची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुशासन अर्थात ‘गुड गव्हर्नन्स’चे काम प्रदीप पेशकार पाहणार आहेत. परराष्ट्र संबंध विभागाशी संबंधित विभागाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस आमदार सुनील राणे यांच्याकडे देण्यात आली आहे. तृतीयपंथी कक्षासाठी डॉ. सावी जेडवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपच्या या नियुक्त्यांमधून समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची संघटनात्मक पोहोच वाढवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक समूहांशी संपर्क मजबूत करण्यासाठी या नियुक्तींची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे नव्या नियुक्त्यांनंतर महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला कोणती दिशा मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







