Hundreds of workers join BJP along with office bearers : शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह भाजपात दाखल
Mumbai: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज, बुधवार 18 डिसेंबर रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी विधीमंडळ सचिवांकडे आपला राजीनामा सादर केला असून, त्यांनी शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती आणि आज त्या अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार केला आहे.
प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी समर्थकांसह विधानभवनात हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘राजीव सातव अमर रहे’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सातव यांना पाठिंबा दर्शवला. हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा राजकीय निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Kokate hit wicket : कोकाटे ही ‘हिट विकेट’, स्वतःच खड्ड्यात उडी मारली; योग्य वेळी केस बाहेर आली !
दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत तथ्य नसल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी आणि असंतोष पुन्हा उघडकीस आला आहे. पक्षांतर्गत संघर्ष, नेतृत्वाचा अभाव आणि भवितव्याबाबतची अनिश्चितता यामुळेच प्रज्ञा सातव यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामागे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात वृत्तवाहिनीशी बोलताना या चर्चांचे खंडन केले. काँग्रेसमध्ये अनेक निष्ठावान आणि वरिष्ठ नेत्यांना आपले भवितव्य सुरक्षित वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याची खंत व्यक्त करत, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यांना संधी न मिळाल्याने असे निर्णय घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशात आपला कोणताही सहभाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष होत्या आणि सध्या विधानपरिषदेच्या आमदार म्हणून कार्यरत होत्या. 2021 मध्ये काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या काँग्रेसकडून पुन्हा विधानपरिषदेवर निवडून आल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. मात्र, आज दिलेल्या राजीनाम्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील प्रवास थांबला आहे.
राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य अशी विविध पदे भूषवतानाच त्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य म्हणूनही जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना राजकीय संधी दिली होती, मात्र आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे.








