व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rahul narwekar : “मराठीचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही”;‘ती एक अनवधानाने झालेली चूक’

Rahul narwekar : “मराठीचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही”;‘ती एक अनवधानाने झालेली चूक’

rahul-narwekar-apologizes-over-marathi-pronunciation-controversy-in-maharashtra-assembly : उच्चारांच्या वादावर राहुल नार्वेकरांची दिलगिरी

Mumbai : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या मराठी शब्दांच्या अशुद्ध उच्चारांवरून निर्माण झालेल्या वादाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर सभागृहात सविस्तर खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठी भाषेचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तर ही एक अनवधानाने घडलेली चूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी निवेदन सादर केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार शोकप्रस्तावांचे वाचन करण्यात आले होते. यावेळी काही शब्दांचे चुकीचे उच्चार झाल्याने तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संदर्भातील शोकप्रस्तावात दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख झाल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Legislative election : १० लाख घेतलेला एक तरी नगरसेवक दाखवा! पराभूत अतुल लोंढेंना भाजपचे खुले आव्हान

या पार्श्वभूमीवर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकूण १२ शोकप्रस्ताव सभागृहात मांडण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांचे वाचन अध्यक्ष म्हणून त्यांनी केले. मात्र, शोकप्रस्तावांची प्रत बारीक आणि अस्पष्ट फॉन्टमध्ये छापण्यात आली होती. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटीदेखील होत्या. सुरुवातीला त्या लक्षात न आल्याने वाचन करताना मजकूर जशास तसा वाचला गेला आणि त्यामुळे ही चूक घडली.

मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान असल्याचे सांगताना त्यांनी गेल्या साडेचार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष म्हणून मराठीतूनच कामकाज हाताळत असल्याची आठवण करून दिली. अनेक भाषणे, शोकप्रस्ताव तसेच सभागृहातील नियम आणि कार्यपद्धती त्यांनी सातत्याने मराठी भाषेतून मांडल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील प्रत्येक नागरिकाला जसा मराठी भाषेचा अभिमान आहे, तितकाच अभिमान आपल्यालाही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आशा भोसले यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचा विचारदेखील कोणताही संवेदनशील व्यक्ती करू शकत नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढू नये, असे आवाहन केले. जे काही घडले ते केवळ अनवधानाने झालेल्या त्रुटीमुळे घडले असून त्यामागे कोणताही गैरहेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sudhir mungantiwar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न प्रस्तावाला विलंब का; विधानसभेत मुनगंटीवारांचा एल्गार

दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील नागरिकांच्या किंवा सभागृहातील सदस्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण मनापासून दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर मराठी उच्चारांच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय आणि सामाजिक चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

error: Content is protected !!