Rohit pawar, ravikant tupkar share stage for the demand of farmers loan waiver : भरती घोटाळ्याविरोधातील आंदोलनात दिसली नवी ‘केमिस्ट्री’; शेतकरी प्रश्नांवरही एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण
Buldhana एमपीएससी, टीईटीसह विविध भरती परीक्षांतील कथित घोटाळ्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आंदोलनाने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले; मात्र या आंदोलनापेक्षा अधिक चर्चा रंगली ती मंचावर दिसलेल्या नव्या राजकीय ‘केमिस्ट्री’ची. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर हे एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
या आंदोलनाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांच्या भरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधातील लढा हा असला, तरी मंचावर दिसलेली नेत्यांची उपस्थिती वेगळ्याच चर्चांना खतपाणी घालणारी ठरली. शेतकरी प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे रविकांत तुपकर आणि विरोधी पक्षातील प्रभावी युवा चेहरा मानले जाणारे रोहित पवार यांची एकत्रित उपस्थिती केवळ योगायोग मानायची, की त्यामागे भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींची चाहूल आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Charkha satyagrah : मुक्त व निष्पक्ष निवडणुकांसाठी मलकापुरात काँग्रेसचा ‘चरखा सत्याग्रह’
विशेष म्हणजे, या मंचावर तुपकर यांच्यासोबत दीपक केदार हेही खांद्याला खांदा लावून दिसल्याने चर्चांना आणखी रंग चढला. विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आलेले हे चेहरे पुढे शेतकरी प्रश्नांवरही एकत्र येणार का, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः राज्यात सरसकट शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, पिकविमा, वीजबिल माफी आणि कृषी धोरणातील बदल यांसारखे मुद्दे पुन्हा ऐरणीवर येत असताना या मंचावरून पुढील राजकीय दिशा ठरणार का, याकडे शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून उभे राहिलेले हे व्यासपीठ पुढे शेतकरी, बेरोजगार आणि ग्रामीण प्रश्नांवरील व्यापक आघाडीत रूपांतरित झाले, तर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू शकतात. तुपकर यांची शेतकरी संघटनांतील ताकद, रोहित पवार यांची विरोधी राजकारणातील सक्रियता आणि इतर सामाजिक-राजकीय चेहऱ्यांची साथ यामुळे भविष्यात नवे समीकरण आकाराला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आंदोलनाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा असला, तरी मंचावर दिसलेली ही राजकीय आणि सामाजिक जवळीक आता केवळ ‘कुजबुज’पुरती राहते की पुढे एखाद्या मोठ्या एल्गाराची नांदी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.








