Shyam Manav alleges that the influence of fake godmen increased in the state due to the Devendra Fadnavis government : एकनाथ शिंदे यांचा सहभाग तपासला पाहिजे, अंनिसने व्यक्त केली शंका
Buldhana सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. पण फडणवीस सरकार आल्यापासून प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री बागेश्वर यांच्यासारख्या मोठ्या बुवा-बाबांचे प्रस्थ वाढत आहे. खरात यांच्यावर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले पण धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी उपस्थित केला.
बुवा-बाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोपही श्याम मानव यांनी आज, सोमवार, दि. २० एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत केला. राज्यभर भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे या पार्श्वभूमीवर अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ‘वृक्ष तिथे छाया बुवा तिथे बाया’ जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. प्रा. श्याम मानव म्हणाले, ‘काँग्रेसच्या काळात बुवा-बाबांवर एफआयआर दाखल करताना पोलीस स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे तर आता सरकारच्या संमतीशिवाय काहीही करता येत नाही. खरातसारख्या भोंदू बुवाबाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातूनच सुरू आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘भाजपच्या एका मोठ्या मंत्र्याने मुख्यमंत्री होण्यासाठी खरात बाबाकडे पूजा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर त्यावर कारवाई झाली. वास्तविक पाहता धीरेंद्र शास्त्री व प्रदीप मिश्रा यांच्यावरही आरोप आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार या दोघांवर कारवाई करणे सहज शक्य आहे. मात्र खरातसारखा न्याय या लोकांना लावण्यात आलेला नाही. खरात वाईट व इतर चांगले, असे होऊ शकत नाही.’
गेल्या काही वर्षांपासून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रचार आणि अंमलबजावणी करण्यात येत नाही. अजितदादा पवार यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. कामही सुरू झाले, मात्र फडणवीस यांनी झुलवत ठेवले. सरकारने या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. हा कायदा राबवायचाच नाही असे त्यांचे ठरले असल्याचे श्याम मानव म्हणाले. अधिकाऱ्यांवर, यंत्रणांवर फार मोठे दडपण आहे








