uddhav-thackeray-on-bachchu-kadu-shiv-sena-entry-political-reaction-marathi-news : उद्धव ठाकरेंचा पहिलाच थेट हल्ला, शिवसेना प्रवेशावरून वातावरण तापलं
Mumbai : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून विधान परिषदेची आमदारकी स्वीकारल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर पहिल्यांदाच थेट आणि तीव्र शब्दांत टीका केली आहे. “घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला.
मातोश्रीवर आयोजित कार्यक्रमात सोलापूर, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळ अंबादास दानवे तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील उपस्थित होते. प्रहार संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंवर टीका करत आणि आपण स्वाभिमानाच्या भूमिकेतून उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलो असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंना उद्देशून अप्रत्यक्ष टोला लगावला. “आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. त्याला घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली. मात्र कार्यकर्ते आजही माझ्यासोबत आहेत, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे एकमेव आमदार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बच्चू कडू हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाशी जवळीक वाढवत अखेर प्रहार पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण जाहीर केले आणि त्यांना विधान परिषदेवर आमदारकी देण्यात आली.
Eknath shinde : संजय शिरसाटांच्या विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, दिली कडक समज
दरम्यान, बच्चू कडू यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत आपण कोणत्याही पदासाठी शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे सांगितले होते. “मला काही मागायचं असतं तर गुवाहाटीला गेलो त्याचवेळी मागितलं असतं. मी पदासाठी नाही, तर दिव्यांग मंत्रालयासाठी लढलो,” असे ते म्हणाले होते.
प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश आणि उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर केलेली टीका यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
__








