supriya-sule-nagpur-dj-jarange-agitation-government-statement-maharashtra : सुप्रिया सुळे यांचा सरकारला आत्मचिंतनाचा सल्ला
Nagpur : राज्यातील विविध प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “सर्व ठिकाणी आंदोलन सुरू आहे. २०० आमदारांचे सरकार आहे, तरी काहीतरी चुकतंय. सरकारने आत्मचिंतन केले पाहिजे,” असे म्हणत सुळे यांनी सरकारला परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला दिला.
पुण्यातील डीजेच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी वाद टोकाला गेल्याचे सांगितले. सरकारने सर्व संबंधितांना एकत्र बोलावून चर्चा करून मार्ग काढण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पोलिसांची भीती राहिली नसल्याचे चित्र चिंताजनक आहे. आगामी काळात आणखी महत्त्वाचे सण येणार असल्याने सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नागपुरातील भंडारे प्रकरणाचा संदर्भ देत सुळे यांनी राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. “हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. राज्यात नेमकं काय चाललं आहे?” असा सवाल त्यांनी केला. सरकारने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
Vhp Navratri Guidelines : दांडियाच्या मैदानात ‘धर्माचा एन्ट्री पास’! मुस्लिमांना प्रवेशबंदी
डीजे किंवा नृत्याला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम आणि कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. नागपुरात कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते, तर ती संपूर्ण राज्यात का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सण साजरे करणे ही महाराष्ट्राची संस्कृती असून, मात्र त्यासाठी कायदा हातात घेणे किंवा कोणावर हात उगारणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण व्यवस्थेवरही सुळे यांनी सरकारला धारेवर धरले. विद्यार्थ्यांवर परीक्षांचा वाढता ताण चिंताजनक असल्याचे सांगत, “मुलांनी नेमक्या कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बारावीची परीक्षा आणि नीटसारख्या प्रवेश परीक्षांचा एकाचवेळी सामना करताना विद्यार्थी मानसिक दबावाखाली येत असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईतील दहीहंडी दुर्घटनेबाबत बोलताना त्यांनी सार्वजनिक उत्सवांमध्ये सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले. घरातील आई, पत्नी आणि बहीण आपली वाट पाहत असतात, त्यामुळे उत्सव साजरा करताना सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये, अशी भावनिक भूमिकाही त्यांनी मांडली. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणावरही सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. राज्याच्या विविध भागांत आंदोलने सुरू असताना सरकारने या परिस्थितीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यातील अस्वस्थता दूर करण्यासाठी सरकारने संवाद साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.








