The board entrusted the responsibility of the examination to the dead teacher : नागपूर बोर्डाचा प्रताप; परीक्षेचे काम करण्याची जबाबदारी
Salekasa एका शिक्षकाचा मृत्यू होऊन सहा महिने लोटले. पण तरीही बोर्डाने अद्याप त्याच्या मृत्यूची नोंद केलेली नाही. उलट मृत शिक्षकावरच परीक्षेची जबाबदारी दिली आहे. नागपूर बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिले आहेत.
संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेने बोर्डाला कळवली आहे. पण तरीही बोर्डाने मृत शिक्षकाच्या नावाने आदेश काढले आहे. त्यामुळे बोर्डाच्या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा आहे. दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. त्यासाठी इतर शाळेतील विज्ञान शिक्षकाला बहिर्गत परीक्षक म्हणून कोणत्याही एका शाळेत पाठविले जाते.
यासाठी बोर्डाकडून विहीत नमुन्यात प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षकांची माहिती मागविली जाते. सालेकसा येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचभाई यांचा २ ऑगस्ट २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याला सहा महिने लोटले. संबंधित शाळेने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती बोर्डाला रितसर पाठविली आहे. तसेच यादीत मिलिंद पंचभाई यांचे नाव पाठविले नव्हते.
असे असताना सुद्धा यंदा ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मृतक शिक्षक मिलिंद पंचभाई यांना तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश पाठविले आहे. हे आदेश प्राप्त होता शाळेला सुध्दा प्रश्न पडला असून बोर्डाच्या अजब कारभाराचा नमुना पुढे आला आहे.
MoS Prataprao Jadhav : पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!
शाळांनी बोर्डाला विद्यार्थी संबंधित माहिती देताना नजरचुकीने एखादी माहिती कमी जास्त झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित शाळेवर दंड आकारला जातो आणि मग दुरुस्ती केली जाते. परंतु बोर्डाने केलेल्या चुकीचे काय? असा सवाल शिक्षक वर्ग करीत आहे.
बोर्डाचे अधिकारी कर्मचारी अद्यावत माहितीची शहानिशा न करता जुन्या यादीच्या आधारावरच नियुक्ती आदेश काढून टाकतात. अनेक वेळा सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या नावाने सुद्धा बोर्डाच्या कामासाठी नियुक्ती आदेश काढतात. जेव्हा की बोर्डाकडे शिक्षकांची नियुक्ती तारीख आणि सेवानिवृत्ती तारीख व माहिती संग्रहित असते. यावरून बोर्ड किती गांर्भियाने काम करते हे दिसून येते.








