Uddhav Thackeray launches a sharp attack on MPs who left Shiv Sena : नागपुरात शिवसैनिकांचा मोठा मेळावा घेणार असल्याची दिली माहिती
Nagpur शिवसेना नक्की काय आहे, हे अद्याप विरोधकांना समजलेलेच नाही. दोन-चार गद्दार खासदार किंवा आमदार फोडले म्हणजे शिवसेना संपून जाईल, हा विरोधकांचा भ्रम आहे. भूतकाळातही असे अनेक गद्दार आपल्याला सोडून गेले, पण निष्ठावंत शिवसैनिक आजही माझ्यासोबत भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पिढ्यान्पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात व्यक्त केला.
६ खासदार आणि ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुरू असलेली पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे अभूतपूर्व आणि उत्साही स्वागत केले. या विराट जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
विमानतळावरील शिवसैनिकांचा उत्साह पाहून भारावलेल्या उद्धव ठाकरेंनी नागपूरकरांना एक मोठे वचनही दिले. ते म्हणाले की, येत्या काही महिन्यांतच आपण नागपुरात शिवसैनिकांचा एक भव्य मेळावा घेणार आहोत. याआधी कस्तुरचंद पार्कवर जशी आपली ऐतिहासिक सभा झाली होती, तसाच मोठा मेळावा आपण पुन्हा घेऊ. सध्याच्या सरकारने नागपुरात एखादे मैदान शिल्लक ठेवले असेल, तर नक्कीच त्या मैदानात हा मेळावा होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
Ketan agrawal case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात; उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील
कस्तुरचंद पार्कवरील जुन्या सभेची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला. आम्ही जेव्हा कस्तुरचंद पार्कवर सभा घेतली होती, तेव्हा काही लोकांनी आमचे मैदान चुकल्याची टीका केली होती, पण आमचे मैदान कधीच चुकत नाही, असे ते म्हणाले. आम्ही जिथे सभा घेतो, ते मैदान शिवसैनिकांच्या अथांग गर्दीने ओसंडून वाहते आणि आमची ताकद काय आहे, हे आम्ही प्रत्येक सभेत दाखवून दिले आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह फुंकला.








