व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी एकच जागा पण इच्छुकांची मात्र भाऊ...

Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी एकच जागा पण इच्छुकांची मात्र भाऊ गर्दी

ncp-ajit-pawar-group-vidhan-parishad-election-2026-candidates-list : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच

Mumbai: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील ९ जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून १२ मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात इच्छुकांची लगबग वाढली असून अजित पवार गटात तर एकाच जागेसाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक असल्याने अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे.

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे एकच जागा उपलब्ध असताना अनेक नेत्यांनी आपली दावेदारी मजबूत केली आहे. यामध्ये झिशान सिद्धिकी, उमेश पाटील, संजय दौंड, सुरेखा ठाकरे, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार आणि राजेंद्र जैन या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेसला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजपचे १३१, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४० आमदार असल्याने त्यांच्या ८ उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ असल्याने त्यांना केवळ एकच जागा सहज मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करणे कठीण असल्याचे चित्र आहे.

Uddhav thackeray : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुनरागमन करणार का?

दरम्यान, विधान परिषदेतील उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे. तसेच प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना २३ एप्रिल रोजी जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे. अर्जांची छाननी २ मे रोजी होईल, तर ४ मे ही माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. १२ मे रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडून १३ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

एकाच जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत राजकारण तापले असून अंतिम उमेदवाराची घोषणा होताच पक्षातील समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

error: Content is protected !!