Even though there allies in mahayuti pressure is increasing from the BJP : महायुतीत मित्रपक्ष असतानाच भाजपकडूनच वाढता ताण
Mumbai : राष्ट्रवादीत बंड केल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत जपून वागण्याची भूमिका घेत होते. थेट टोकाची विधाने टाळत त्यांनी मित्रपक्ष भाजपबरोबर अंतर राखले होते. या काळात महायुतीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र दिसत असताना, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अस्तित्व वेगळे जाणवत होते. मात्र महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपच्या राजकारणाचा खरा चेहरा अजित पवारांना दिसला आणि आतापर्यंतचा संयम सुटताच अजितदादांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपकडूनही प्रत्युत्तरांची सरबत्ती सुरू झाली आणि ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी अजित पवारांची अवस्था सध्या झाल्याचे चित्र आहे.
आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे अजित पवार काँग्रेससोबत असताना अनेकदा बेधडक विधाने करत असत. मात्र जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीत बंड करून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी तुलनेने नरम भूमिका घेतली. भाजपच्या राजकारणात मित्रपक्षांना स्वतंत्र ताकद उभी करू दिली जात नाही, हा अनुभव अनेकांनी घेतला आहे. केंद्रातील अपरिहार्यतेमुळे चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांना वेगळे स्थान मिळते, मात्र अजित पवारांच्या बाबतीत तसे नाही.
Municipal elections : काँग्रेस आणि एमआयएमसोबतची युती खपवून घेतली जाणार नाही !
सिंचन घोटाळा, पार्थ पवारांशी संबंधित जमीन प्रकरणे अशा आरोपांमुळे अजित पवारांचे हात दगडाखाली असल्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकारमध्ये शांत राहावे, अशी भाजपची अपेक्षा असल्याचे बोलले जाते. शरद पवारांचे राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी भाजपने अजित पवारांचा प्रभावीपणे वापर करून घेत सत्तेत वाटा दिला. वित्त, कृषी आणि सहकारसारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे देण्यात आली.
लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळवून देण्यात अजित पवार गट अपयशी ठरला. बारामतीत अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत 40 पेक्षा अधिक आमदार निवडून आणत अजित पवारांनी आपले वजन वाढवले. तरीही भाजपला मिळालेल्या मोठ्या यशामुळे अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकले नाहीत.
Mumbai politics : हेच बघायचे राहिले होते! चक्क काँग्रेसचा भाजपमध्ये प्रवेश
महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडवर आपले वर्चस्व राहावे, अशी अजित पवारांची अपेक्षा होती. किमान पिंपरी-चिंचवड तरी राष्ट्रवादीसाठी सोडावे, अशी त्यांची भावना होती. मात्र भाजपने गोड शब्दांतून स्पष्ट भूमिका घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर अजित पवारांकडे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय उरला नाही.
या संघर्षात अजित पवार गटाचे माजी नगरसेवक भाजपकडे वळले. उमेदवारांच्या पळवापळवीला सुरुवात झाली. त्यानंतर अजित पवारांनी काका शरद पवारांकडे मैत्रीसाठी हात पुढे केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कागदोपत्री तरी एकत्र आल्या. भाजपने यावर आडकाठी आणली नाही, मात्र अजित पवारांनी थेट भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर चित्र बदलले.
Municipal elections : भाजपच्या चुकीमुळे नाहक त्रास नको, लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ !
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अजित पवारांनी भाजपच्या संवेदनशील मुद्द्यांवर बोट ठेवले. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांसोबतच आपण सरकारमध्ये असल्याचे विधान करत त्यांनी भाजपला डिवचले. यानंतर भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवारांची कोंडी सुरू केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चाताप झाल्याचे विधान केले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन घोटाळ्याचा खटला अद्याप सुरू असल्याची आठवण करून देत सज्जड दम भरला. आशिष शेलार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मान्य करण्याचा सल्ला दिला. भाजपकडून ही पद्धतशीर कोंडी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देत याला ‘नुरा कुस्ती’ असे संबोधले.
Navneet Rana : ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
प्रचार संपायला अजून काही दिवस शिल्लक असताना हा तणाव किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अजित पवारांनी अद्याप त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजपच्या आरोपांना उत्तर दिलेले नाही. राजकीय वास्तव पाहता भाजपपेक्षा अजित पवारांना भाजपची अधिक गरज आहे. त्यामुळे निवडणुकीपुरते हे तणावाचे नाट्य चालेल आणि नंतर दोन्ही बाजू झाले-गेले विसरून पुन्हा एकत्र नांदतील, असेच चित्र सध्या दिसत आहे. कारण वेगळा विचार केल्यास भाजपकडून राष्ट्रवादीत फूट पाडली जाण्याची भीती असून, पुढील चार वर्षे विरोधात बसण्याची अजित पवारांची मानसिकता नाही. त्यामुळे महायुतीत ‘जमेना आणि करमेना’ हेच वास्तव कायम राहणार आहे.
___








