devendra-fadnavis-praises-modi-government-criticizes-upa-economic-policy : “यूपीए सरकारचं धोरण अनुदानावर देश चालवण्याचं होतं”
Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या विकासकामांचे कौतुक करताना काँग्रेसप्रणित यूपीए सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना फडणवीस यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामाजिक परिवर्तनापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात भारताने आत्मनिर्भरतेकडे मोठी झेप घेतल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, “आज भारत आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून स्वाभिमानाने जगासमोर उभा आहे. मोदी यांनी केलेल्या कामांची यादी एका पुस्तकात मांडणंही शक्य नाही. विविध क्षेत्रांत झालेलं परिवर्तन हीच या 12 वर्षांची खरी ओळख आहे.”
गरीब कल्याणाच्या योजनांचा उल्लेख करताना त्यांनी मोदी सरकारने समाजातील वंचित घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर काम केल्याचे सांगितले. “गरिबांना गॅस, घर आणि शौचालय देण्यासारख्या योजनांनी सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवला. मोदीजींनी गरीब केंद्रीत अजेंडा राबवला आणि त्याचा थेट फायदा देशातील कोट्यवधी नागरिकांना झाला,” असे फडणवीस म्हणाले.
Yugendra pawar : अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांनी सोडला राजकीय बाण
गेल्या दहा वर्षांत भारताने 25 कोटी लोकांना गरिबीरेषेबाहेर काढल्याचा दावा करत त्यांनी ही बाब जगानेही मान्य केल्याचे सांगितले. “जगातील कोणत्याही देशाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना गरिबीतून बाहेर काढणे शक्य झाले नाही. भारताने मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या धोरणातून हे करून दाखवले,” असे ते म्हणाले.
देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत बोलताना फडणवीस यांनी भारताच्या जीडीपी वाढीचा उल्लेख केला. “2013 साली भारताचा जीडीपी 103 लाख कोटी रुपये होता. आज तो 357 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या दहा वर्षांत भारताची अर्थव्यवस्था तिप्पट वाढली आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणांवरही कठोर टीका केली. “यूपीए सरकारच्या काळात लोकांनी अनुदानावर जगावं, अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार करण्यात आली होती. लोकांसाठी योजना आणायच्या पण नवी संधी निर्माण करायची नाही, हे त्यांचं धोरण होतं,” असा आरोप त्यांनी केला.
“पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची इच्छाच यूपीए सरकारमध्ये नव्हती. त्यामुळे देशात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक संधी निर्माण होऊ शकल्या नाहीत. अनुदानप्रणित अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा ताण आला,” असेही फडणवीस म्हणाले.
Supriya sule : जावई-व्याहींसह आधी मोदींची भेट, नंतर इंधन दरवाढीवरून केंद्रावर हल्लाबोल !
मोदी सरकारने मात्र पायाभूत सुविधा, उद्योग, डिजिटल व्यवस्था आणि गुंतवणूक वाढीवर भर दिल्याने भारत जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने पुढे जात असल्याचा दावा त्यांनी केला. “मोदीजींनी देशासाठी भक्कम पाया रचला आहे आणि आता भारत केवळ पुढेच जाणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांच्या या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
__








